Monday 18 July 2016

रहे ना रहे हम (भाग १३)

बाबानं मला एकदोनदा आडून विचारलं की मी कॉलेजसाठी मुंबईला गेलं तर मला आवडेल का? मुंबईला माझा काका होता. शिवाय बाबानं याच वर्षी पनवेलला एक नवीन फ्लॅट घेतला होता. आईनं तितक्याच स्पष्टपणे मला सांगितलं की मी दूर गेले तर तिला करमणार नाही. मला तरी आईबाबाशिवाय कुठं करमलं असतं.
कॉलेज चालू झालं म्हणण्यापेक्षा माझ्या मरणयातना पुन्हा एकदा चालू झाल्या. गेल्या दोन वर्षामध्ये मी आणि केदारनं आमचं नातं कधी लपवलं नव्हतं. आम्ही काय प्रोफेसरांच्या समोरून गळ्यात गळे घालून फिरलो नव्हतो. सेक्स वगैरे गोष्टी आम्ही आमच्यापुरत्याच ठेवल्या होत्या. तरीही लोकांना यांचं लफडं आहे हे समजलं की पुढची गणितं आपोआप जुळवता येतात. आम्ही या सर्वांमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंय अशातलाही भाग नव्हता. केदारला फायनलला फर्स्ट क्लास होता. मी तरी एस वायला चक्क डिस्टींक्शन मिळवलं होतं. तरीही निर्भीडपणे माझं नातं समोर ठेवण्याचे इतके गंभीर परिणाम होतील असं मला वाटलं नव्हतं. कॉलेजमध्ये अगदी अकरावीची टुल्ली पोरं पण मला बघून घाणेरड्या कमेंट्स मारायला लागली. जणू काही ही पोरगी अव्हलेबलच आहे असं प्रत्येक मुलाला वाटत होतं.

आमच्या वर्गात जाह्नवी म्हणून एक मुलगी होती. बारावीनंतर तिचं लग्न झालं पण महिन्याभरातच नवरा वारला. सासरची माणसं चांगली होती. त्यांनी जाह्नवीला पुढे शिकायला परवानगी दिली. या जाह्नवीची काळजी अख्खं कॉलेज घ्यायचं. अगदी तिनं असाईनमेंट केली नाही तरी तिला कुठलाही प्रोफेसर काही म्हणायचा नाही. कारण ती बिच्चारी होती. माझ्याच वर्गात राधा होती. तीपण लग्नानंतर शिक्षण पूर्ण करत होती. तिला सर्व मैत्रीणी फार मान द्यायच्या. “घरचं सर्व व्यवस्थित करून मग ती कॉलेजला येते.” चुटपुट सणांसाठी ती रजा राहिली तरी तिचं प्रॅक्टिकल दुसर्‍या बॅचसोबत नंतर करवून घेतलं जायचं. जाह्नवी, राधा आणि मी. काय फरक होता. जाह्नवीचं लग्न केवळ नावापुरतं झालं होतं. महिन्याभरात तिला असा कितीसा नवरा कळणार होता. राधा सासुरवाशीण होती, तरी शिकत होती. पण तिचं प्राधान्य केवळ घराला आणि नवर्‍याला आधी होतं. मी? माझं केदारवर प्रेम होतं. आम्ही अजून लग्न केलं नव्हतं, तरी एकत्र होतो. या तिघींमध्ये मीच वाईट होते. फरक होता तो गळ्यामधल्या मंगळसूत्राचा आणि कपाळावरच्या कुंकवाचा. आय हॅड अन अफेअर आणि ते प्रक्ररण यशस्वी ठरलं नव्हतं.
केदारने मला “युज” करून मग सोडलं असंही काही लोकं म्हणाली. मी अर्थात त्याच्याशी कधीच सहमत नव्हते. जेव्हा सेक्समध्ये आमेहे दोघंही पुरेपूर एकत्र आनंद घेत होतो, तेव्हा तोच एकटा काही मला “युज” करत नव्हता, मग आता त्याला दोष का द्यायचा? काही लोकं असंही म्हणाले की, मी लग्नाआधीच सेक्स केल्याने केदारनं मला सोडलं. हेही काही खरं नाहीच. केदारने हे लग्न अतिशय मनाविरूद्ध केलं होतं हे मला चांगलंच माहित होतं. त्याच्या लग्नानंतर आईच्या एका मैत्रीणीने आम्हाला सर्व काही घडलेला किस्सा सांगितला. अक्षरश: केदारनं त्या मुलीच्या गळ्यांत मंगळसूत्र बांधेपर्यंत त्याचे घरवाले त्याच्या आजूबाजूला बॉडीगार्डसारखे उभे होते. लग्न लावल्यानंतर त्याच्या आईनं पाण्याचा पहिला घोट घेतला. केदारसाठी ही सर्व जबरदस्ती होती. आपल्या घरचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करत आहेत हे त्याला चांगलंच माहित होतं. लग्नानंतरही त्यानं त्या मुलीसोबत कसलेही संबंध जाऊदेत अगदी बोलायलाही नकार दिला होता. एकाच घरामध्ये असूनही केदार तिच्यापासून दूर रहायचा. आईला वडलांना, काकाकाकीला वाट्टेल ते बोलून दाखवायचा. वर्षभरात घटस्फ़ोट देईन असंही म्हणायचा वगैरे. आई कायम शेजार्‍यांविषयी अथवा आमच्या काही नातेवाईकांविषयी असले काही किस्से सांगताना  जितक्या निर्विकारपणे मी ऐकायचे तितक्याच निर्विकारपणे मी हा किस्सा ऐकला. घटस्फोट काही झालाच नाही. पुढे काही वर्षांनी केदारला त्याच पत्नीकडून मुलगा झाल्याचंही समजलं तेही तितक्याच निर्विकारपणे मी ऐकलं. एका क्षणासाठीही मला तेव्हा वाईट वाटलं नाही. इर्ष्या वाटली नाही. जे झालं ते झालं. खूप वर्षांनी ते फेसबूकवर गेम अस्तात ना तशाच एका “व्हॉट इज सुपरपॉवर” वाल्या गेमवर तो बावा मला म्हणे युयर सुपरपॉवर इज विस्डम” म्हटलं पूर्णपणे गंडलास. माझी सुपरपॉवर असलीच तर ती विसरण्याची आहे. मी काही गोष्टी साफ विसरते. याही प्रकरणामध्ये मी महत्त्वाचा व्हिलन कोण आहे ते पूर्णपणे विसरून गेले होते.
असंच एकदा वैतागले होते तेव्हा जादू मला सहज म्हणाला. “वेळेचा प्रश्न असतो गं. जसा काळ जातो तसं सर्व काही धूसर होतं. आठवणीसुद्धा.”
“तू अश्विनीला असाच विसरलास?”
“क्कोण? ओह. अश्विनी.” तो जरा हसला. “असाच विसरलो. किती वर्षं झाली कुणास ठाऊक. त्या दिवशी जेव्हा समजलं तेव्हा तुझी आता जी हालत आहे तीच माझी झाली होती पण आता तिचा चेहराही नीट आठवत नाही...”
“खोटं बोलतोयस. अशा आठवणी डीलीट करता आल्या अस्त्या तर बरं झालं अस्तं ना?”
“पण मग जगायची मजाच कसली? आठवणी तर आपल्याला जिवंत ठेवतात. खरं सांगू? आठवणी डीलीट करायच्याच नाहीत. त्या एकतर कंट्रोल डीलीट करायच्या शक्य असेल तर नाहीतर सरळ हिडन फोल्डरमध्ये नेऊन ठेवायच्या. असा हिडन फोल्डर जो आपल्यालाही कधी सापडणार नाही.”
“मला आयुष्यात कधीही शक्य होणार नाही.”
“अजून पाच वर्षांनी मी हाच प्रश्न तुला विचारेन. तेव्हा उत्तर दे. पण आता माझं सर्वात महत्त्वाचं काम कर.” त्यानं खिशामधून एक व्हिजिटींग कार्ड काढून माझ्या हातात दिलं. “कसं आहे डीझाईन?”
“हे काये? उर्दूत लिहिलंय”
“पलटून बघ”
पलटलं तर त्यावर “अरिफ इलेक्ट्रीकल्स” असं मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. खाली जादूचा नंबर पत्ता वगैरे.
“नवीन बिझनेस चालू करतोय. इलेक्ट्रीकल फिटींगचा. त्याचीच सर्व धावपळ गेली महिनाभर चालू होती. आफताबने रजिस्ट्रेशन वगैरेसाठी खूप मदत केली.. आणि हे कार्ड अजून फायनल केलं नाही. तुझा जरा डीझाईनचा सेन्स चांगला आहे म्हणून तुला विचारतोय. काही चेंजेस हवेत का?”
“कार्ड छानच आहे, पण उर्दूमध्ये कशाला?”
“असंच. मला छान वाटतं शिवाय या गावात तसा मी नवीनच आहे, अम्मीच्या नातेवाईकांपैकी थोडेफार लोकं ओळखतात आणी नूरीचे माहेरवाले. त्यामुळे कसं जरा बिरादरीमध्ये अपनापन येईल ना? म्हणून.” माझ्या चेहर्‍यावरचे भाव बघून तोही एकदम बावरला. “माझी नाहीय...ही आफताबची आयडीया आहे. त्यानंच सांगितलं. उर्दू, देवनागरी आणि रोमन अशा तीन स्क्रीप्टमध्ये नाव लिहायचं” ते ऐकून मला फार हसू आलं. हे असे इतके मायन्युट डीटेल आफताबच सांगू शकतो. आमच्यासारखे सामान्य लोकं मराठी इंग्लिश उर्दू म्हणून मोकळे झाले अस्ते.
“आपल्याच घरामध्ये एक खोली ऑफिस म्हणून चालू करतोय. बाकी बराच वेळ साईटवर जाईल. ओपनिंग फार आधी करणार होतो. पण तुझे हे सर्व प्रॉब्लेम्स चालू होते.. म्हणून म्हटलं निवांतच करू या. जून फर्स्ट वीकमध्ये करूया?”
“माझ्या प्रॉब्लेममुळे तू का थांबलास. आफ्टर ऑल तुझा बिझनेस आहे....” जादू काही न बोलता हसत उठला. त्यानं मला सांगितलं नसलं तरी थोड्या दिवसांनी आफताबने सांगितलं. जादूला नवीन बिझनेससाठी बाबानं पैसे दिले होते. जास्त नाही, जितके कमी पडत होते तितकेच. पण नंतर जादूनं कधीही ते पैसे परत करायचा प्रयत्न केला तेव्हा बाबानं ते घेतले नाहीत. “कधी मला गरज लागली तर तुझ्याकडून हक्कानं घेईन” असं त्याला म्हणायचा. बाबाचा एरवी मला फार राग येतो. पण त्याच्याबद्दल असं काही आठवलं ना की फार अभिमानही वाटतो.
थर्ड इयर म्हणजे स्पेशलायझेशनचं वर्ष. माझ्यासमोर झूलॉजी किम्वा बॉटनी असे दोन पर्याय होते. मी बॉटनी निवडला. कारण केदारचं झूलॉजी होतं म्हणून मी आधी तेच करणार होते. पण आता परिस्थिती बदलली होती, सर्वच ऑप्शनचा सुरूवातीपासून विचार करणं गरजेचं होतं.
मला तसंही बॉटनी आवडायचं. फिजिक्स केमिस्ट्री बरोबर माझी यारीदोस्ती कधी झालीच नाही. बॉटनीमधली झाडंपानंफळंफुलं आवडायची. पण त्याहून आवडायची ती सेल बायोलॉजी. शरीराचं काय झाडांचं काय प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग डोळ्यांना जसा आणि जितका दिसतो तो बाजूला करायचा. आपली दृष्टी अधिकाधिक सूक्ष्म करत जायचं आणि पोचायचं एकेका पेशींपर्यंत. जीवनाचा असलेला सर्वात बेसिक सोर्स. त्याही सोर्समध्ये असलेले भाग न्याहाळायचे. पेशींना दु:खं होतात का? पेशींना आनंद जाणवतो का? आपण सर्व बनलोय या पेशींपासून. मग एकेका सूट्या सुट्या पेशींना नक्की काय अस्तित्व असतं. या बेसिक युनिट ऑफ लाईफ पासून आपण तयार होतो. मग आपण नक्की कोण आहोत? अर्थात हे प्रश्न काही अभ्यासक्रमामधले नव्हेत. असंच मला रिकामं बसलं की पडणारे प्रश्न. त्यांना फारस काही अर्थ नाही.
सेल् बायोलॉजीचं प्रॅक्टीकल माझ्या कायम आवडीचं. बाकीच्या मुली कुरकुरायच्या, त्या मायक्रोस्कोपमध्ये डोळे घालून डोकं दुखतं, कंबर अवघडते. मला तसं कधी वाटायचं नाही. उलट कितीही वेळ मी त्या मायक्रोस्कोपखाली दिसणार्‍या पेशींना मी पाहत बसले असते. दिस इज वंडरफुल. माझ्या शरीरामध्येही अशाच पेशी आहेत. लाखो करोडो, मोजताही येणार नाहीत इतक्या. या सर्व पेशी “स्वतंत्र” आहेत. त्यांना त्यांचं जीवनमान आहे, आयुष्य आहे, जन्म आहे मृत्यू आहे. या सर्व पेशींचा समुच्चय म्हणजे मी. मग स्वतंत्र कोण? मी की पेशी?
त्या दिवशी ओनियन रूट टिपचं प्रॅक्टीकल होतं. फर्स्ट इयरपासूनच माझ्या स्लाईड्स कायम चांगल्या बनायच्या. पण त्याबद्दल माझं कधी प्रोफेसर लोकांनी फारसं कौतुक केलं नाही. मी वर्गामधल्या सर्वात हुशार मुलींच्या ग्रूपमधली नव्हते ना. खरंतर मी सध्या कुठल्याच ग्रूपमध्ये नव्हते. हुशार नाही. मठ्ठ नाही. मी सर्वसाधारण होते. माझ्याकडून माझ्या शिक्षकांना तशाही फार काही अपेक्षा नव्हत्या.  त्या दिवशी मायटोसिसची प्रक्रिया अभ्यासायची होती. मायटोसिस या ना त्या रुपांत अकरावीपासून कुठेना कुठे भेटत आलेलाच होता.
पेशींच्या केंद्रामधला क्रोमोझोमचं रूपांतर दोन स्वतंत्र एकसारख्या क्रोमोझोममध्ये होतं आनि त्यांना स्वत:चं स्वतंत्र केंद्रक मिळतं. पण अकरावीला शिकलेला हा इतकुलासा मायटोसिस थर्ड इयरला फारच डीटेलमध्ये स्टडी करायचा होता. प्रोफेसर बाईंनी सांगितल्याबरहुकूम मी कांद्याच्या मुळाचा एक सेंमीचा तुकडा काढला. तो व्यवस्थित धुवून घेतला. त्यावर हायड्रोक्लोरिक ऍसिड घालून त्याला बारा मिनिटं वॉटर बाथमध्ये ठेवला. परत पाण्याने सर्व ऍसिड धुवून त्यावर फेलुजेन स्टेन घातला. यामुळे पेशींच्या डीएनएला कलर येतो. नंतर परत ते रूट धुवून त्याला मायक्रोस्कोप स्लाईडवर ठेवला. नंतर कव्हर टिप ठेवून किंचित ठेधून त्या मुळाचा पापुद्रा बनवला. मायक्रोस्कोप ऍडजस्ट करून पाहिलं तर माझी स्लाईड व्यवस्थित दिसत होती. मॅडम लॅबमध्ये इकडे तिकडे फिरत सर्वांच्या स्लाईड्स बघत होत्या. माझी स्लाईड बघून त्या म्हणाल्या. “व्हेरी गूड! लिसन क्लास! स्वप्निलची स्लाईड येऊन बघा. इथं सेलच्या सर्वच स्टेजेस अगदी क्लीअर दिसत आहेत” प्रॅक्टीकलच्या बॅचमधला प्रत्येकजण येऊन माझी स्लाईड बघून गेले. “स्लाईड कशी बनवायची ते स्वप्निलकडून शिकून घ्या. किती नीट नाजुकपणे तिनं हे काम केलंय बघा.” मॅडम सर्वांना म्हणाल्या.
मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी स्केचेस रेडी करून घेतली. आजचा दिवस खरंच खूप मस्त होता. जुलैचा रात्रभर पाऊस पडून गेलेला दिवस कसा प्रसन्न असतो. आमच्या तिसर्‍या मजल्यावरच्या बायोच्या लॅबमधून दूरवर असलेला समुद्र दिसायचा. करड्या रंगाचा समुद्र त्यावर करडं आकाश. मध्ये पसरलेलं हिरवंगच्च माळरान. थोड्या दिवसांनी श्रावण आला की त्या माळरानावर रंगीबेरंगी फुलंच फुलं यायची. मॅडम वर्गामध्ये काहीबाही सांगत होत्या. कुणी लिहून घेत होतं. माझं मात्र तिकडे लक्षच नव्हतं. मी नजर परत मायक्रोस्कोपकडे वळवली. इवलाल्या त्या चिमुकल्या पेशी. यांचा आकार किती तर ०.७५ मिमी.  एका मिमीनेही कमी असणाया या पेशी बघण्यासाठी माझ्या नजरेपेक्षा हजारपटीने सूक्ष्म पाहू शकणारा मायक्रोस्कोप हवाच.
 मी मायक्रोस्कोप ऍडजस्ट केला. डोळ्यांनाही न दिसणार्‍या अशा पेशींमधले क्रोमोझोम्स. गुणसूत्रं. कुठल्याही जिवंत गोष्टीची सुरूवात जिथून होते ते हे क्रोमोझोम्स. आय वॉज वॉचिंग लाईफ. सजीवाला निर्जीव आणि निर्जीवाला सजीव बनवतात ती ही गुणसूत्रं. आणि माझ्या डोळ्यांसमोर या इवलाल्या अर्ध्या सेंमीच्या पापुद्र्यामधली क्रोमोझोम्स चक्क एकाचे दोन बनत होते. लाईफ मूव्ह्ज ऑन. जरी त्याला भविष्य नसलं तरीही... जीवन पुढे जात राहतं. किंबहुना भविष्याची पर्वा न करता ते पुढे जात राहतं. त्याच्या वेगाप्रमाणे. त्याच्या गतीने, त्याच्या कुवतीने. म्हणून तर सजीव जगतो. “जगणं” म्हणजे केवळ जगणंच असतं का? मी आयुष्याची वीस वर्षे जगली आहे. पण इतकी वर्षं जगताना अशा कित्येक अब्जो खरबो पेशी मेल्यात. यापुढेही मी जगेन ते या पेशींच्या जन्मानं पेशींच्या मृत्यूनं. अख्खं प्रॅक्टीकल संपेपर्यंत मी माझ्य स्लाईडमधले ते क्रोमोझोम्स बघत होते. एक विक्षिप्त आणि शांत वलय मनामध्ये तयार होत होतं.
जुलै महिन्याच्या त्या दुपारी लॅबमधून बाहेर पाहत असताना हलकेच पावसाला सुरूवात झाली तेव्हा मला जाणवलं—आपल्याला काय करायचंय.
मला जगायचंय ते मी स्वतंत्र अस्तित्व म्हणून. पण माझं आधीचं अस्तित्व पुसून न टाकता. एका पेशीच्या दोन पेशी होण्यासाठी आधीची पेशी मारावी लागत नाही. नवीन स्वप्निल तर जन्मली पाहिजे, पण जुनी स्वप्निल मरता कामा नये.
एमएससीला जायचा निर्णय असो किंवा चांगली नोकरी सोडून पीएचडी करायचा निर्णय असो, या सर्वांमागे जुलै महिन्यामधली ही दुपार आहे. त्या दृश्यानं मला माझं अस्तित्व शोधून दिलंय.

>>>>>>>>>>>
“बहोत घुमाया आपने हमे! चले, आज हम आपको घुमाये” आफताब उगाचच अदबीनं झुकून मला म्हणाला. त्यानं नवीन कार घेतली होती. पैनपै वाचवून केलेली ही आयुष्यामधली सर्वात मोठी खरेदी. खरंतर अझरभाईचा बिझनेस अजून इतका पण नीट बसला नव्हता पण कायम बाईकवरून फिरायचा म्हणून आफताबनं ही कार घेतली. घेताना “मला कार घ्यायचीच” असा हट्ट केला आणि घरी आणल्यावर मात्र, पुण्य़ाच्या ट्राफिकमध्ये काय नीट चालवणार? त्यापेक्षा इथं गावातच राहू देत असा लकडा लावला. म्हणजे घेतली ती मुळातच अझरभाईसाठी...
पण स्वत:ची कार हे त्याचं खूप आधीपासूनच स्वप्न होतं. मी सातवीत असताना आम्ही मारूती घेतली होती. तो आणि मी बारावीनंतर एकत्र त्याच कारवर ड्रायव्हिंग शिकलो. ती कार तर त्याच्या हातात एकदम रूळली होती. बाबापेक्षा जास्त त्यानं चालवली असेल. मी अजूनही बिचकत चालवायचे, पण आफताब एकदम प्रो होता.
चार दिवसांच्या सुट्टीला आलेला आफताब आज परत निघाला होता. आईनं केलेलं भाज्यांचं लोणचं त्याला देण्यासाठी मी गडग्यावरून उडी मारून आले होते. अझरभाई घरात नव्हता. नूरीभाभी  किचनमध्ये काहीतरी करत होती. तिला इथं येऊन इतके दिवस झाले तरी ती माझ्याशी जास्त बोलायची नाही. मी तरी कशाला मुद्दाम बोलायला जाऊ! आफताबच्या इंटर्नशिपचे थोडेच दिवस शिल्लक राहिले होते. फायनलच्या परीक्षेआधी तो परत एकदा पुणं सोडून गावी अभ्यासाला येणार होता.
“चल, रहने दे. मला नवीन कारमधून अझरभाई फिरवेल” मीपण त्याला चिडवलं. नूरीभाभीच्या हातून किचनमध्ये ताट पडलं.
“भाभी, कुछ हेल्प चाहिये क्या?” आफताबनं बसल्या जागी ओरडून विचारलं. आतून काहीच आवाज आला नाही.
“मुद्दाम करतेय” माझ्याकडे वळून तो कुजबुजत्या आवाजांत म्हणाला. “कार घेतली ना, ते आवडलं नाही”
“त्यात न आवडण्यासारखं काय आहे? अझरभाईला फिरायला बरी पडेल.” मी पण आवाज कमी ठेवला.
“त्याची बहुतेक कामं खेड्यांतून आहेत. बाईकवर उन्हापावसांतून किती फिरणार? तर म्हणे उगाच खर्च केला. त्यापेक्षा तेवढेच पैसे घालून बाजारपेठेंत फ़्लॅट घेऊ”
“तिकडे कशाला?”
“इकडे सर्व हिंदू आहेत. आपल्यातलं कोणच नाही. तिला एकदम एकटं पडल्यासारखं होतं. भिती वाटते म्हणे.”
“उगाचच. काझी फॅमिली किती वर्षं राहतेय की”
मी शाळेत असताना कुठंतरी मशिद पाडली म्हणून आमच्या गावांत दंगे झाले होते तेव्हादेखील बाबा आणि शास्त्री आजोबांनी आमच्या परिसरामधल्या सर्वांच्या घरी जाऊन शांत रहायला सांगितलं होतं. काझी अंकल इथे नव्हते काझीआंटी आणि त्यांची तीन मुलं होती तरी त्यांना कसलाही त्रास झाला नाही. दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये दंगे झाले तेव्हाही गावामध्ये कसलेही दंगे होऊ न देता सर्व काही सुरळीतपणे चालू होतं.असल्या ठिकाणी या नूरीला कसली भिती वाटतेय?
आम्ही पुढे काही बोलायच्या आधीच किचनमधून खाण्णकन काच फुटल्याचा जोरात आवाज आला. दोघंही धावतच किचनमध्ये गेलो तर मी आताच आणलेली लोणच्याची बाटली खाली पडून फुटली होती. ती बाटली मघाशी मी डायनिंग टेबलावर व्यवस्थित सरकवून ठेवली होती. “कैसे एकदम कोपरेपे रख्खे. मै जरा गलतीसे हाथ लगाया तो गिर गयी” ती आमचयवरच वसकत म्हणाली.
आईनं सकाळीच बाबाला आठवडा बाजारात पिटाळून कितीतरी भाज्या मागवल्या होत्या. त्या धुवून चिरून त्याचं लोणचं मुद्दाम घातलं होतं. आमच्यासाठी अगदी वाटीभरच बाजूला ठेवलं आणि उरलेलं सगळं तिनं आफताबसाठी दिलं होतं. पुण्यात तो आणि तीन  मित्र मिळून भाड्यानं राहत होते. जेवणासाठी त्यानं मेसचा डबा लावला होता, त्यामधली भाजी काहीवेळा खराब व्हायची म्हणून चवीसाठी आईनं केलेलं सगळं लोणचं आता फरशीवर पडून खराब झालं होतं. भरीसभर बाटली फुटल्याने त्यात काचा मिसळल्या होत्या.
“साफ तो करना होगा” नूरीभाभी वैतागून म्हणेपर्यंत आफताबनं हातात खराटा घेतला होता. “रहने दो भाभी, मै कर दू.” म्हणत त्यानं झाडायला सुरूवात पण केली. मला खरंतर इतकं वाईट वाटलं होतं. पण नूरीभाभीला विशेष काही वाटलं नव्हतं. आफताबनं सगळ्या काचा काढून फरशी साबणानं पुसून घेईपर्यंत ती हॉलमध्ये बसून सीरीयल बघत होती.
“आईला सांगते घरामध्ये आहे तितकं...”
“अजिबात नाही” आफताब माझ्यावर डोळे वटारून म्हणाला. “काकींनी इतक्या कौतुकानं केलं होतं ते असं वाया गेलं म्हणून सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल. काहीच बोलू नकोस. असं समज की बरणी घेऊन मी पुण्याला गेलो. कुणालाही काही बोलू नकोस. तिला असा दुसर्‍याचा हिरमोड करायला फार आवडतं” मी एक क्षण आफताबकडे बघतच राहिले. इतका बदलला हा? दुसर्‍याचा इतका विचार त्याला करता येतोय?
“चुकून पडली असेल”
“स्वप्निल, टेबलावरची बरणी चुकून जमीनीवर पडेल? हात लागला तर जागच्या जागी कलंडेल. डायरेक्ट फरशीवर येऊन कशी फुटेल? कोपर्‍यावर ठेवली नव्हती हे मलाही माहित आहे. तिनं मुद्दाम केलंय. तिचा माझ्यावर फार राग आहे.”
“पण का? तू तर इथं नसतोस”
बोलत असताना आफताबनं कचरा पिशवीत भरून फेकला (गंमत म्हणजे पाचच मिनिटांपूर्वी जी वस्तू खायची होती ती लगेच आता कचरा बनली. अशावेळी मला अरिफची आठवण येतेच!)
“मी इथं असलो नसलो तरीही... स्वप्नील,” त्यानं मला अंगणातच थांबवलं, “ही बाई वेडी आहे. कंप्लीट सायको”
“काहीही”
“आजवर कुणालाच बोललो नाही. पण भाई आणि हिच्यामध्ये सर्व काही आलबेल नाहीय. रोज दोघांची भांडणं होतात. भांडणं म्हणजे.. ही बोलत असते आणि भाई ऐकतो. चुकूनमाकून त्यानं काही उत्तर दिलंच तर ही अजूनच आरडाओरडा करते”
“आमच्याही घरी कधी ऐकू येतो. पण त्यात..”
“हे बघ,” त्यानं पाठी अंगणात वाळत घातलेले कपडे दाखवले. “माझ्या शॉर्ट्स. इथं आलो की कायम अशा कापलेल्या असतात. तीच कापते. तिला मी थ्रीफ़ोर्थ घातलेल्या आवडत नाहीत. धर्माच्या विरूद्ध आहे म्हणते”
“क्काय्य? आफताब, तू काहीही बोलतोयस आता”
“मी खॊटं सांगतोय का? सीरीयसली, ती घरात सायकोसारखी वागते. आता तुझ्यासमोर लोणच्याची बरणी फोडली. हे माझे कपडे कापलेले दिसत नाहीत का? भाई व्हेज खातो म्हणून कित्येकदा त्याच्या भाजीत चिकनचे तुकडे टाकते. मी पाहिलंय. विचारलं की म्हणते गलतीसे गिर गया. भाई रोज नमाझ पढत नाही त्यावरून तर इतकी किटकिट करते. भाईला म्हणते हे घर विकून आपल्या एरियामध्ये जाऊन रहायचं. इथं राहिलं तर आपली मुलं पण तुमच्यासरखीच काफिर होतील”
“म्हणजे?”
“आम्ही फार रीलीजीयस नाहीये. नूरी एकदम कर्मठ आहे. घरामध्ये बर्‍याच गोष्टी तिला आवडत नाहीत. भाई तर तुला माहिताय, सगळ्यावरून ओवाळून टाकलेला आहे. फ्रायडेची नमाझ मुश्किलीने पढतो. तिला लवकर बाळ हवंय. लग्नाला दोन वर्षं झाली पण भाई म्हणतो की जोपर्यंत सर्व काही ठिक होत नाही तोपर्यंत नको. मग परत दोघांत वादावादी. आय गेस, भाईला हे लक्षात आलंय. तिचं वागणं, तिला मेंटली प्रॉब्लेम आहे ते, म्हणूनच तो बेबीसाठी...” आम्ही बोलत असतानाच काहीतरी कामाचं निमित्त काढून नूरी मागे अंगणात आली. ती अलेली बघून आफताब एकदम गप्प झाला. मी पण काहीच बोलले नाही. तरी तिला एकंदरीत तिच्यावरूनच विषय चालू असेल हे समजलं होतं. ती परत आत गेल्यावर मी म्हटलं. “शॉर्ट्स घालू नको! धर्माविरूद्ध आहे”
“डोण्ट आस्क, तिच्या मते, माझं सी ए शिकणं पण धर्माविरूद्ध आहे. तिच्या सांगण्यानुसार आम्ही वागलो ना तर कंप्लीट वेडे होऊ. भाईची तर हालत खराब करून ठेवली आहे. तुला माहित नाही. तो हल्ली रोज पितो.”
“तो उगाच सांगतोस. बाबासोबत महिन्यातून कधीतरी.”
“स्वीटहार्ट, माझ्या खोलीत त्यानं बाटल्या लपवल्यात. यतीनकाकासोबत प्यायला बसतात ते वेगळंच. हे घरात वेगळंच. त्यावरूनसुद्धा नूरी भडकते. प्यायलेला असेल तर त्याला बेडरूमममध्ये येऊन देत नाही. म्हणून तो रोज पितो. कळ्ळं? लिसन, तिची चर्चा पुरे. संध्याकाळी रेडी रहा. आपण नवीन कार घेऊन फिरायला जाऊ”
“निधीपण येणारे?”
“निधी चारचौघांत माझ्यासोबत कुठे येते का? आज तर बिलकुल येणार नाही. तिची कायतरी एक्झाम आहे. त्यामुळे आज तू आणि मी. तू म्हणशील तिथं जाऊ. चालेल?”
“तुला रात्री परत पुण्याला जायचंय तेवढं लक्षात ठेव. खूप दूरवर नेऊ नकोस” त्या संध्याकाळी आम्ही गावाच्या जवळच फिरायला गेलो.
“तुला ड्राईव करायचंय?” परत येताना आफताबनं विचारलं.
“नको. तू मस्त चालवतोयस. नवीन कार असूनपण”
“कित्ती आळशी आहेस गं तू” त्यानं मला चिडवलं. “मला ना लहानपणापासून ड्रायवर व्हयचं होतं. गाड्यां तेव्हापासून आवडायच्या. आता फायनल झाली ना की मी हेवी व्हेइकलचं लायसन्स काढणार आहे”
“आफताब – द ट्रक ड्रायव्हर!”
“इन्शा अल्लाह, तेही करून बघू.”
माझं  फायनलचं वर्ष रडतखडतच सुरू झालं पण पहिलं सेमीस्टर संपायच्या आधीच मी माझ्या नवीन आयुष्यात कंफर्टेबल झाले होते. इतके दिवस कॉलेज इज इक्वल टू केदार असं समीकरण होतं ते बदलून कॉलेज इज इक्वल टू स्टडींग असं नवीन समीकरण रूजवून घेतलं. गौतमीच्या नोट्स झेरॉक्स करून घेणे आणि त्या वाचणे म्हणजे माझा अभ्यास असायचा. पण गेले महिनाभर मी गौतमीसोबत बसून नोट्स काढत होते. त्यासाठी चारपाच पुस्तकं लायब्ररीमध्ये बसून वाचायची, समजून घ्यायची वगैरे करताना मला आवडत होतं. आफताबला इतके दिवस बूकवर्म म्हणून चिडवायचे, पण आता जाणवलं की पुस्तकं खरंच तुम्हाला किती कंफर्ट देऊ शकतात. रिकामं बसलं की डोक्यामध्ये वेगवेगळ्या विचारांची गर्दी व्हायची, पुस्तकं वाचताना मात्र (भले ती अभ्यासाची असोत वा नसोत) ते सगळे विचार बाजूला काढून टाकल्यासारखे व्हायचं. आफताबनं मला एका कधी न ऐकलेल्या लेखकांचं पुस्तक वाचायला दिलं होतं. “वनवास” नावावरून मला हे फारच बोअर किम्वा रडकू पुस्तक असेल असं वाटलं होतं. पण काय पुस्तक होतं ते!! सहज काय आहे म्हणून बघयाला पहिलं पान उघडलं ते डायरेक्ट सगळं पुस्तक संपवून मगच उठले. दुपारी कधीतरी वाचायला लागले होते. तिन्हीसांज झाली तरी मी वाचतच होते. आयुष्यात मी पहिल्यांदाच एखादं पुस्तक असं सलग वाचलं होतं.
साधं सरळ आणि तरीही एकदम गुंगवून ठेवणारं लिखाण. केदारप्रकरण झाल्यानंतर मी इररांसमोर खोटं खोटं कित्येकदा हसली असेन, पण माझ्या खोलीत बेडावर पालथं पडून उशीवर हात ठेवून ते पुस्तक वाचताना मी एकटीच अगदी खरंखुरं मनापासून हसले होते. नंतर झपाटल्यासारखी मी प्रकाश संतांची उरलेली तीन पुस्तकं मागवली आणि अशीच सलग वाचली. एका नवीनच निरागस पण खूप ओळखीच्या विश्वाची नव्यानं ओळख झाल्यासारखं वाटायला लागलं.
इतके दिवस कॉलेजमधल्या प्रोफेसरांसाठी मी “जस्ट अनदर गर्ल” होते. माझ्याकडून त्यांना तशाही काही अपेक्षा नव्हत्या, पण गेले काही दिवस मात्र माझं एकंदर प्रॅक्टीकलमधलं स्किल बघून मला “तू नंतर एमएस्सी का करत नाहीस?” असा सल्ला मला दिला होता. वेल, पुढे शिकायचंय हे मी कित्येक दिवस आधीच ठरवलं होतं. एम बी ए, मास कॉम, एम सी ए वगैरे अनेक मास्टर्स कोर्स करता येण्यासारखे होते. माझ्या आवडीचं म्हटलं तर फॅशन डीझायनिंग, ऍडव्हर्टायझिंग वगैरे कोर्सेसची माहितीपण मी काढायला सुरूवात केली होती. यापैकी कुठलाही कोर्स आमच्या गावात नव्हताच. म्हणजे पुढं शिकायचं झालं तर गावातच एम एस्सी करायची किंवा गाव सोडून पुण्यामुंबईला जायचं.  केदार प्रकरण झाल्यामुळे आईबाबा मला गावाबाहेर पाठवतील का याची मला खात्री नव्हती गावातच एम एस्सी करायचं म्हणजे “लग्न जमेपर्यंत शिकत राहणे” याचं एक  गोंडस नाव झालं असतं आणि तेच मला करायचं नव्हतं.
अखेर काहीतरी निर्णय घ्यावा लागणारच होता.

Monday 11 July 2016

रहे ना रहे हम (भाग १२)

शहराबाहेर अनेक नवीन बिल्डिंग बांधल्या जात होत्या. तशाच एका कॉलनीमधल्या छोट्या पण नवीन बिल्डिंगसमोर केदारने गाडी थांबवली.
“माझ्या मित्राचा फ्लॅट आहे.” तिसर्‍या मजल्यावरच्या एका दाराचं कुलूप उघडत तो म्हणाला. “तो दोन वर्षासाठी युएसला गेलाय. मला म्हणाला कुणी भाडेकरू मिळाला तर बघ. एकदम नवीन आणि फुली फर्निश्ड फ्लॅट आहे. म्हटलं, मलाच भाड्यानं दे.”
“म्हणजे?”
“तुझं आणि माझं कधीही होऊ देत. महिन्याभराने किंवा तुझी डिग्री झाल्यावर. आपण इथंच रहायचं. जॉइंट फॅमिलीमध्ये तुला टोचून हैराण करतील. तुझ्याच्याने ते निभवणार नाही. त्यापेक्षा आपण आधीपासून वेगळं राहूया” केदार उत्साहानं नुसता फसफसत होता. “तुझा आणि माझा संसार. काऊ, आपला संसार”
“आता मी बोलू? बाबा तयार झाला. जूनमध्ये लग्नासाठी” केदार आधी खुश दिसत होता, मी हे सांगितल्यावर तो जे काय दिसायला लागला त्यासाठी जगामध्ये शब्दच नाहीत.
“खरंच.” त्यानं मला जवळ ओढून मिठीत घेतलं. वेल, फ्लॅट मस्तपैकी फर्निश्ड होताच. आम्ही सेलीब्रेशन अगदीच दणक्यात केलं. रात्री जवळजवळ दहा वाजता मी घरी गेले. मी उशीर होइल म्हणून फोन केलाच होता. केदार मला सोडायला घरी आला तेव्हा आईनं त्याला आत बोलावलं. “जेवूनच जा” बाबा म्हणाला.
उशीर होइल सांगण्यासाठी त्यानं घरी फोन केला. फोनवरचा निरोप ऐकताच त्याचा चेहरा एकदम बदलला. “मी लगेच निघतो. घरी प्रॉब्लेम झालाय.” इतकंच म्हणून तो निघाला.


यानंतर जे काय घडलं ते मला सरळपणे कधीच समजलं नाही. तुकड्यातुकड्यांत थोडं याच्याकडून त्याच्याकडून. केदारच्या त्या काकींना हे लग्न मोडण्यासाठी अखेर अतिशय परफेक्ट कारण त्याच दिवशी मिळालं होतं. आधीसारखं त्यांनी केवळ केदारच्या आजीआजोबांना वगैरे न सांगता सरळ घरामध्येच सर्वांना एकत्र बोलावलं. केदार तेव्हा दुकानात असणार हे त्यांना माहित होतं. त्यामुळे त्याला ही सर्व भानगड माहितच नव्हती. सर्वांसमोर काकीनं अखेर आपलं अमोघास्त्र फेकलं. हे लग्न आता मॊडायलाच हवं होतं.
काकीला कुठूनतरी आईच्या कॅन्सरबद्दल समजलं होतं. काकीच्या मते, इतकी मह्त्त्वाची गोष्ट आम्ही त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. काकीने कुठल्यातरी मॅगझिनमधलं आर्टीकल शोधून हा कॅन्सर अनुवंशिक असतो आणि मला होण्याचे कितीतरी टक्के चान्सेस आहेत वगैरे भाषणबाजी केली. शिवाय सोबत कुठंही लिहिलें नसताना उद्या हा कॅन्सरसारखा आजार केदारला झाला तर काय असा बिनडोक सवालही केला. हा कॅन्सर केवळ आणि केवळ “भानगडी” केल्याने होतो, म्हणजे माझा बाबा आणि माझी आई दोघंही वाईट चारित्र्याचे आहेत हा निष्कर्ष काढला.


खरंतर आईला कॅन्सर झाला होता ही गोष्ट काही कुणी लपवली नव्हती. माझ्या जन्माच्या आधी जी लोकं आईबाबाला ओळखत होती त्यांना ही गोष्ट माहित असणार. आईचं युटेरस काढून टाकलंय हे तर बहुतेकांना माहित होतं. यानंतर आईला अर्थात मूल झालंच नसतं. मीच एकटी हेही माहित होतं. पण काकीबाईनं सर्व फॅक्ट्स तिच्या मनाला येईल तसे उलट सुलट करून वापरले. शिवाय स्वत:ला मूल झालेलं नसल्याचं दु:ख त्यात मिसळलं. आणि उद्या केदारच्या बायकोच्या बाबतीत असंच झालं तर घराण्याचं काय? असं विचारलं. जितकं मी ऐकलंय त्यावरून तरी काकीचा हा एकपात्री प्रयोग फारच परिणामकारक झाला असणार. कारण, लगेच केदारच्या आजोबांनी हे लग्न कुठल्याही परिस्थितीत होणार नाही हे सांगितलं. त्यावर केदारची आई काही बोलायला गेली तर लगेच इतरांचे आवाज वाढले. घरामध्ये इतका आरडाओरडा आणि गोंधळ झाला की केदारच्या पणजीचं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून त्यांना ताबडतोब नेऊन आयसीयुमध्ये ऍडमिट करावं लागलं. तिथे नेताना पणजींनी “माझी इच्छा आहे की केदारचं लग्न त्या मुलीबरोबर करू नका” असं सांगितलं. इथं केदारच्या आईंनी पण आमच्या नात्याचा हात सोडून दिला. नव्वद वर्षांच्या म्हातारीच्या अखेरच्या इच्छेचा मान म्हणून एका विशीमधल्या मुलीच्या भविष्याचा खून करण्यात आला.


हे सर्व असं काही घडलंय याची मला कल्पनाच नव्हती. बाबा तयार झालाय याच आनंदात मी होते. नेटवर इमेजेस सर्च करत होते. शालू कसला घ्यायचा. घागरा घ्यायचा का? हनीमूनला कुठं जायचं? केदारला सूट छान दिसेल की शेरवानी. करवली म्हणून निधीला सांगायचं. तिला मस्त डीझायनर साडी आहेरात द्यायची. माझ्या लग्नात मला बुफेचं जेवण नको. छान पंगत मांडायची. रिसेप्शनला मात्र चाटचे वेगवेगळे स्टॉल्स हवेतच. तेव्हा टिपिकल जेवण नको. आईचे सगळे दागिने जुन्या स्टाईलचे आहेत.. मला नेकलेस वेगळ्या स्टाईलचे हवेत. कानातले मोराच्या डीझाईनचा एक हवाच. बांगड्यांना देवदास स्टाईलचे झुमके हवेत. देवदासवरून  आठवलं, मला वेणीमध्ये घालायला ते हेअर ऍक्सेसरीजचे पिसेस हवेत.
दुसर्‍या दिवशी बाबा केदारच्या घरी जाणार होता. पुढची बैठक कधी करायची म्हणून विचारायला. पण त्याआधीच  सकाळी दुकानांत गेल्या गेल्या त्याला केदारची पणजी सीरीयस असल्याची खबर मिळाली. आईला त्यानं फोन करून सांगितलं म्ह्णून आई पद्धतीनुसार हॉस्पिटलामध्ये बघायला गेली. तिथे काकीबाईंनी आईला हवंनको ते सर्व काही आयसीयुच्या दारात ऐकवलं. तेव्हा केदारची आई तिथं नव्हती.

आई परत आली तीच डोळे पुसत. मी केदारला दुकानात फोन लावला, घरी फोन लावला. अगदी तो ज्या इन्स्टिट्युटमध्ये हार्डवेरचा कोर्स करत होता तिथेही फोन केला. केदार कुठेही नव्हता.
तीनचार दिवस याच भानगडीमध्ये गेले. माझा निरोप केदारपर्यंत पोचत नव्हता. बाबा एकदा केदारच्या घरी जाऊन आला. तिथे केदार कामानिमित्त गोव्याला गेलाय म्हणून सांगितलं. लग्न मोडलंय हे तर आता स्पष्टपणेच ऐकवलं.

मला त्या घरातल्या इतर लोकांबद्दल काहीही देणंघेणं नव्हतं. मला फक्त केदारचा आवाज ऐकायचा होता. त्याला बघायचं होतं. भेटायचं होतं. बाबा म्हणाला “त्या म्हातारीला डिस्चार्ज देऊन घरी आणलं की मगच जाईन. घरात काय पाताळात कुठे असेल तिथून शोधून आणीन. दोन तासांत नाय रजिस्टर मॅरेज लावलं तर बघ. घाबरू नकोस”

मला रात्रभर झोपच येत नव्हती. एकदा अशीच या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते तेव्हा फोन वाजला. रात्रीचा दीड वाजला होता. इतक्या रात्री कुणाचा फोन असेल म्हणून मी दुसर्‍याच रिंगला फोन उचलला.
“हॅलो. झोपली होतीस?” पलिकडून आवाज आला.
“केदार! केदार....” माझ्या आवाजावरून मी झोपले नव्हतेच हे त्याला समजलं असेलच.
“काऊ! आय मिस यु” त्याचा आवाज खूप खोलवर आणि दमलेला वाटत होता. “आय रीअली मिस यु” तो दारू प्यायला होता का? बहुतेक हो.
“केदार, कुठे आहेस? किती फोन केले. तुझ्या दुकानात पण मी येऊन गेले. आई पण हॉस्पिटलमध्ये..”
“माहित आहे गं. सगळं माहित आहे. तू इकडे ये. आता. ताबडतोब”
“रात्रीचा दीड वाजलाय. केदार, तू आहेस कुठं? मी उद्या सकाळी येते. तुझ्या घरचे नाही म्हणतात ना लग्नाला. नक्को तर ठिक आहे. तू आणि मी लग्न करू. मला तुझं घर नकोय. फक्त तू हवायस”
“मला फक्त तू हवीस. काऊ, आज आईला ऍडमिट केलंय.. गेले चार दिवस ती काही खातपित नाहीय. अडकलोय गं मी. मला म्हणते मी तुझा नाद सोडून द्यायचा. कसं शक्य आहे? मी तुझा नाद सोडून द्यायचा...” नक्कीच केदार प्यायलेला होता.
“हे काय चालूये? केदार, तुझ्या घरामध्ये मला आणि माझ्या घरच्यंना बरंच काही बोललं गेलंय. मी ते सर्व इग्नोर करेन. पण तू.. तू माझा साथ देशील ना? सांग ना?”
“आईचा बीपी खूप कमी झालाय. सलाईन लावलं तर तेही तिनं काढून टाकलंय. कावेरीताईचा फोन आला. मलाच ओरडली. आईची किंमत नाही. मी वाईट आहे. मुलीचा नादासाठी आईला, पणजीला मारायला उठलोय. मी या घराण्याचा एकमेव वारस. मीच घरातल्यांना मारतोय.. मी काय करू?”
रात्री दीड वाजत त्या अंधारामध्ये मी कानाला रीसेव्हर लावून जागच्याजागी बर्फ होत गेले. दिस कान्ट बी हॅपनिंग. केदार, माझा केदार मला सोडू शकत नाही. नो. मी आजपर्यंत आयुष्यात काही वाईट काम केलेलं नाही. कुनालाही दुखावलेलं नाही. माझ्याबाबतीत असं घडू शकत नाही. प्लीज. देवा. प्लीज. प्लीज.
“एकच वर्ष काय... स्वप्नील.. अख्खं आयुष्य घेऊन टाक. पण सोडव मला या द्विधेमधून ... तूच सांग मी काय करू?”
 “केदार, मी आता काय करू?” अखेर मी बोलले.
“आता इकडे ये. ताबडतोब. मला घेऊन चल. माझ्यात एकट्यानं हिंमत नाही. पण तू सोबत असशील तर मी येईन. तू म्हणशील तिथं. ये ना”
“येते, मी आता लगेच येते. डोन्ट वरी. तुझ्या आईला पण काही होणार नाही..”
“आईनं माझ्या कानाखाली मारली. मला विचारलं. तुझे तिच्यासोबत काही शारीरीक होतं का? म्हटलं हो. तर म्हणाली किती दिवस. म्हटलं गेले दोन वर्षं. मग काकी म्हणाली की पाहिलंत दोन वदर्षांत तिला काही झालं नाही म्हणजेच ती वांझा आहे. मी म्हटलं तसं नाही. वी युज प्रोटेक्शन. तर आईनं मला थोबाडीत मारली. पुढं बोलू नको”
“हे सगळं आता बोलायची वेळ नाही. तू कुठे आहेस? मी येऊ ना?”
“मला कोंडून ठेवलंय, काऊ. मला या खोलीत बंद केलंय. माझ्या काकांनी. मी बाहेर जाऊ नये म्हणून. बहिणीनं फोन आणून दिला म्हणून मी फोन केला. तुला. तुझी खूप आठवण येते. माझ्यात हिंमत नाहीये काऊ. तुला आठवतं मी त्या दिवशी तुला म्हणालो मित्रांसोबत पैज लावली. काही पैज लावली नव्हती.”
“माहिताय रे”
“नाही माहित तुला. रोज बघायचो. कॉलेजमध्ये. खूप आवडायचीस. पण बोलायची हिंमत नव्हती. निधीकडून तुझी माहिती काढली. अखेर एके दिवशी हिंमत केली. तू पण बोललीस. पन तरी मी.... घाबरलो होतो. काऊ, माझ्यात हिंमत नाहीये”
“आपल्याला काय लढायला युद्धावर जायचं नाहीये. तुझं आणि माझं आयुष्य आहे. मी येते. आता लगेच तुझ्या घरी. तुझ्या घरातलेच काय स्वर्गातले देव पण मला अडवू शकणार नाहीत. कळलं?”
मी बोलत राहिले पण पलिकडून काही आवाज आला नाही. फोन कट झाला होता. आमचा कॉलर आयडी तेव्हा बंद पडला होता, त्यामुळे फोन कूठून आलाय ते समजेना. मी त्याच्या घरचा फोन फिरवला. रिंग वाजत राहिली.
माझा फोनवरचा आवाज ऐकून आई उठून बाहेर आली होती. काय बोलणं झालं ते मी सर्व तिला सांगितलं. बाबा पण उठला. मला म्हणे, चल आता त्याच्या घरी जाऊ. आई त्यालाच ओरडली. रात्रीच्या वेळी काय तमाशे करायचेत का? उद्या सकाळी जाऊया.
सकाळ उजाडली तेव्हा केदारच्या भल्यामोठ्या घरात कुणीही नव्हतं. दुकानही बंद होतं. दुकानामध्ये काम करणार्‍या लोकांनापण काही माहित नव्हतं. केदार म्हणाला होता की आई ऍडमिट आहे म्हणून बाबानं हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. पण केदारची आई गावामधल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नव्हती.
चार दिवसांनी निधीनं मला केदारच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका आणून दिली. तिच्याकडे कुणीतरी आणून दिली होती म्हणे. अजून पंधरा दिवसांनी केदारचं लग्न होतं. त्या काकीच्या भावाच्या लेकीसोबत.
>>>>>> 

मी या कहाणीमध्ये केदारला व्हिलन करू शकते का? नक्कीच. त्यानं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. लग्नाची आमिषं दाखवली. माझा उपभोग घेतला. नंतर वेळ आल्यावर मला सोडून घरच्यांच्या पसंतीनं लग्न केलं. केदार टिपिकल व्हिलन कधीही होऊ शकतो. पण मी करणार नाही. कारण, मला त्याची बाजू माहित आहे. हे लग्न त्यानं मनाविरूद्ध केलं होतं. हे सर्व घडलं तेव्हा तो काही फार मोठा नव्हता. अवघा बावीशीचा तर होता. तसं अरेंज मॅरेजवाल्यांच्या दृष्टीने लग्नासाठी “जरा लवकरच”. त्यानं काय करणं अपेक्षित होतं? माझ्यासोबत पळून जाणं. घरच्यांसोबत भांडणं, घरच्यांशी संबंध तोडणं.... यापैकी काहीही केलं असतं तरीही आमचं लग्न झालंच असतं का? तो मला चल पळून जाऊ असं तीन चारदा म्हणाला. मीच नको म्हटलं. आईनं पळून जाऊन लग्न केलं होतं आणि वीस वर्षानंतरही तिला यावरून टोमणे ऐकावे लागत होते.


केदार स्वत:हून म्हणाला की त्याच्यामध्ये हिंमत नाही. पण हिमतीचा प्रश्न का येतो? त्यानं माझ्यावर प्रेम केलं.. मी त्याच्यावर प्रेम केलं. सिंपल. त्यासाठी आम्हाला इतकी यातायात का करावी लागली? आम्चं लग्न होऊच नये म्ह्णून इतका आटापिटा का केला? आज कित्येक वर्षांनी मी जेव्हा कधी या संपूर्ण प्रकरणाचा विचार करते तेव्हा मला एकच कारण जाणवतं. इगो. केदारच्या घरामधल्या लोकांचा इगो दुखावला गेला होता. कारण त्यानं स्वत:हून लाईफ पार्टनर निवडली. ही त्याची सर्वात मोठी चूक. त्यानं मीच काय माझ्याऐवजी दुसरी कुठलीही सद्गुणी सुशील पोरगी आणली असती तरी तिला हेच ऐकावं लागलं असतं.. आमच्या लोकांचा ना एक प्रॉब्लेम असतो. आम्हाला आमच्या पोरांच्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा हवा असतो. त्यापैकी लग्न हा तर सर्वात मोठा कोपरा. मुलाने स्वत:हून मुलगी निवडली की ती “वाईट्ट” असणार हे आम्ही आपलं आपण ठरवून मोकळे होतो. वयाच्या अडनिड्या कोपर्‍यावर त्याला कुणीतरी “आवडतं” तो धीर करून तिच्याशी बोलतो. ती त्याला प्रतिसाद देते, दोघं एकमेकांना आवडतात. जाणून घेतात. शरीराच्या, मनाच्या, भावनेच्या प्रत्येक पायरीवर एकमेकांच्या जवळ येतात. हळूहळू एकमेकांमध्ये गुंततात. भविष्याची स्वप्नं पाहू लागतात. एकमेकांच्या व्यक्तीमत्त्वामधले दोषसुद्धा त्यांना जाणवतात, पण ते दोष स्विकारण्याची मानसिकता त्यांची तयार होते. या सर्व क्रियाप्रक्रियांशी या लोकांना काही देणंघेणं नस्तं. त्यांच्या मते, तरूण पोरं प्रेमं करतात ते केवळ सेक्ससाठीच. सेक्स त्या वयात फार महत्त्वाचा असतो. नाही कोण म्हणतंय? पण अशावेळी ती मुलगी मात्र लगेच बदफैली होते. मुलगा “नादाला” लागतो. अरेंज मॅरेजमध्ये कसं सर्व काही सुरळीत समाजमान्य पद्धतीने. लग्नाच्या मांडवात एकमेकांना पाहिलेले नवरा बायको अजून काही तासाभरातच एकमेकांच्या अंथरूणात असतात. आता त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र असतं त्यामुळे तिच्यासोबत त्याच मुलानं काहीही केलं तरी ते चालू शकतं. किंबहुना “काहीही” करावं हीच अपेक्षा असते. मग ते नवरा बायको स्वत: कितीका ऑकवर्ड असेनात का. सेक्सची क्रिया तीच, पण आता ती लफडेबाज नसते. “पवित्र” असते. दांभिकपणाच कळस असतो हे सर्व काही. हरतालिकेच्या नावानं उपास करायचा चांगला नवरा मिळावा म्हणून. पण त्या पार्वतीनं नवरा आपल्या मनानं निवडला होता याकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करायची.

केदारच्या बाबतीत हेच तर घडलं. त्यानं मुलगी निवडली हा राग सर्वात मूळचा. इतर सर्व त्यावर नुसती पुटं चढवलेली. अर्थात हे मला तेव्हा सुचलेलं शहाणपण नाही. आज कित्ये्क वर्षांनी विचार करताना जाणवतं. आता जाणवून तरी काय उपयोग आहे. तीर कमानसे निकल चुका. तसा मी फारसा केदारचा विचार करतच नाही. केला तरी त्या सर्व आठवणींचा पूर येतो.


अरिफने मृत्यूशी माझा परिचय करून दिला होता. केदारमुळे मृत्यूशी मैत्री झाली. मृत्यू काय असतो? शेवटचा श्वास घेणं? शरीराचं कुजणं? प्रेताची आग होणं? नाही, मृत्यु केवळ इतकाच नसतो. मृत्यू असतो आपल्याच मनामध्ये आपण मारून टाकलेलं कुणीतरी. मी मनातल्या मनात केदारला कितीतरीवेळा मारलं. प्रयत्न केला. कितीतरी दिवस मी स्वत:ची समजूत घातली की केदार मेला. त्यानं मला धोका दिला नाही. मृत्यु त्याला ओढून घेऊन गेला. तो घरामध्ये असाच गप्पा मारत होता. अचानक चक्कर येऊन पडला आणि तो गेला. अगदीच अचानक. मी त्याच्या प्रेताला गेले होते. त्याची आईबाबा काकी काका सर्व खूप रडत होते. केदार तिरडीवर झोपला होता. मी त्याला बघून खूप रडले. आई मला सांभाळत होती तरी मी धाय मोकलून रडत होते. इतकी रडले की अखेर डोळ्यांतून वाहण्यासाठी अंगात पाणीच शिल्लक राहिलं नाही. 
मग नंतर मला त्याचा कंटाळा आला. मग मी मनातल्या मनात दोन तीनदा त्याचा खून केला. मग तेही बोरींग झालं. मग मी सरळ केदारला परदेशांत पाठवलं. मग मी केदार आणि निधीचं अफेअर आहे असं मला समजलं म्हणून मी त्याला सोडलं असंही करून पाहिलं. मनाचे कितीही खेळ केले तरी सत्य परिस्थिती काही बदलत नव्हती.


केदारने केवळ मला सोडून दिलं नाही, तर त्यानं लग्नदेखील केलं. खरंतर त्याला जबरदस्तीनं करावं लागलं. वैद्यकशास्त्र सांगतं की तुम्ही शरीराच्या वेदना थोड्या दिवसांनी विसरून जाता. ती वेदनांची तीव्रता नंतर आठवत नाही. पण मानसिक वेदना मात्र कधीच तश्या नसतात. कितीही दिवसांनी, कितीही वर्षांनी जरी त्या आठवल्या तरी त्या तितक्याच तीव्र असतात. तसंच या केदारच्या आठवणींचं आहे.
केदारच्या लग्नाचं समजल्यापासून बाबा केवळ धुमसत होता. काहीही करून त्यानं हे लग्न मोडलं असतं. लग्न नाहीतर केदारचे हातपाय नक्कीच. मीच सांगितलं नको म्हणून. काय उपयोग होता? ज्या रात्री केदारने मला फोन केला तेव्हा तो कारवारकडच्या कुठल्यातरी मूळगावी होता. ही लग्नाची भानगड त्यांनी तिथंच निस्तरली. लग्न लावून जवळ्जवळ चार दिवसांनी ते सर्व जण गावात परत आले. हे सगळे दिवस मी घरामध्ये बसून काढले.  अजून काय करणार होते? रोज जादू भेटायला यायचा. असंच काहीतरी गाणी अथवा पिक्चरची डीव्हीडी द्यायला. आला की तासभर गप्पा मारायचा. माझं मन हलकं करण्यासाठी तो येतोय हे मला समजत होतं. पण दोन तीनदा त्यावरून त्याचं आणि नूरीचं भांडण झालं. नूरी त्याच्याशी भांडताना मुद्दाम किचनच्या कट्ट्य़ाजवळ उभं रहून ओरडायची. म्हणजे तो आवाज माझ्याही खोलीपर्यंत पोचायचा. मीच मग जादू आला की “मला बाहेर जायचंय” असं सांगून कार घेऊन जायला लागले.
कॉलेजच्या फर्स्ट इयरला असल्यापासून मी वजन कमी करायच्या मागे लागले होते. तशी लहानपणापासून गुबगुबीत होतेच, पण एफवायपर्यंत पारच जाड झाले होते. जिम आणि एक्सरसाईझ चालू केला होता, डायेटिंगचे असफल प्रयत्नही चालू होते. पण या महिन्याभरात मी कसलाही व्यायाम न करता दहा किलो वजन कमी केलं. डोक्यावरचे केस पातळ झाले. सहज केसांतून हात फिरवला तरी गुंताच्या गुंता हातात यायचा. आईला बाबाला माझी फार चिंता होती. बाबा तर म्हणायला लागला चल, कुठंतारी फिरून येऊ. हिमालय नाहीतर दुबई सिंगापोर असं कुठंतरी लांब, मला कुठंही जायचं नव्हतंच.


मी केदारसाठी  रडत वगैरे होते का? तर नाही. मला एक गोष्ट समजली होती की आता केदार माझा राहिला नाही. केवळ लग्नामुळे आमचं नातं बदलत होतं का? माझ्या मनामध्ये एक प्रसंग मी कायम रंगवायचे. केदार परत आलाय. त्याचं लग्नं झालंय तरी तो परत आलाय. त्याचं अजून माझ्यावर किती प्रेम आहे तो सांगतोय. मीही त्याला तेच सांगतेय. “खड्ड्यात गेलं तुझं ते लग्न. आय डोंट केअर. तू अजूनही माझाच आहेस. माझाच राहशील. मी अशीच लग्नाशिवाय तुझ्यासोबत रहायला तयार आहे” पण मग तितक्यात केदारची बायको तिथं येते. मी तिला कधी पाहिलं नाही पण तिचा चेहरा सेम माझ्या आईसारखा. आणि आरश्यामधलं माझं प्रतिबिंब् थेट त्या काळ्यासावळ्या संध्यासारखं. मी चिडून तो आरसाच फोडून टाकते.


मी आयुष्यात कधीही “दुसरी बाई” बनू शकले नसते. दुसर्‍याची कुठलीही वस्तू मला नको हवी होती. केदार चाप्टर मी माझ्यापुरता तरी संपवून टाकला. आईबाबाला माझी तडफड दिसत होती, समजतही होती. पण त्यांना हे समजत नव्हतं की मी आता केदारसाठी झुरत नाहीये. इट्स ओव्हर. संपलंय ते सर्व काही.
डिग्रीचं फायनल आता पूर्ण करायचंच होतं. त्यानंतर काय...
रात्र रात्र झोप लागत नव्हती ती या विचारानेच. या दिवसांमध्ये मी स्वत:ला खूप म्हणजे खूप प्रश्न विचारले. आपल्याला केवळ कुणाची तरी मिसेस इतकीच ओळख हवी आहे का? आपण काहीतरी केलंच पाहिजे. माझ्यासमोर भलीमोठी पोकळी होती, निर्वात होता. त्या पोकळीमध्ये मला माझं आयुष्य बसवायचं होतं. असंतसं अस्ताव्यस्त नाहीतर नीटपणे सुबक मांडून. केदारच्या लग्नाची तारीख उलटून चारपाच दिवस झाले असावेत. एके रात्री अकरा वाजता कुणीतरी माझ्या खोलीचं दार वाजवलं. मी कंप्युटरवर गेम खेळत बसले होते. समोर आफताब उभा होता.
“कशी आहेस?” त्यानं विचारलं. माझा एकंदरीत अवतार बघून तो बराच दचकलेला दिसत होता.
“ठिक, तू कसा काय आलास?”
“एक फोन सुद्धा केला नाहीस ना?” त्यानं दोन्ही हात पसरून माझ्या खांद्यावरून वेढून मला जवळ घेतलं. आमच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये पहिल्यांदाच आम्ही इतक्या जवळून एकमेकांना स्पर्श केला असेल. पण हा स्पर्श समजूतदारपणाचा होता. आश्वासकतेचा होता “आय कॅन अंडरस्टॅंड युअर पेन” हे सांगणारा हा स्पर्श होता. इतक्या घट्टपणे. पुढे आयुष्यामध्ये मी कितीतरी वेळा आफताबच्या मिठीत शिरले. पण याक्षणी त्याच्या स्पर्शात दिलासा आणि अनुभूती होती. त्यानं मला काही संगायची गरजच नव्हती. तो मला तसाच धरून कितीतरीवेळ उभा होता. माझ्या केसांमधून हलकेच हात फिरवत तो म्हणाला. “त्याच्याकडून सीरीयसली ही अपेक्षा नव्हती” मग तो म्हणाला.
“जे झालंय ते ऑलरेडी होऊन गेलंय. प्लीज. त्यावर आपण नको बोलूया.” मी त्याच्यापासून दूर होत म्हटलं. “अचानक कसा आलास?”  
“सहज दोन दिवस सुट्टी मिळाली म्हणून आलो. थोडं इकडं भाईचं काम पण होतं.”
“ओके.” पुढं काय बोलावं ते त्याला सुचत नव्हतं. एरवी आफताब कधीही आला तरी पिटपिट बोलायचा, मला चिडवायचा, चेष्टा करायचा. आज मात्र तो शांतपणे केवळ माझ्याकडे बघत उभा होता.  
दोन दिवसांनी आफताब परत गेला, जाताना केवळ मला एकदा हाक मारली. बाकी पूर्णवेळ तो घराबाहेरच होता. माझ्याशी फारसा बोललापण नाही. महिन्याभरानंतर कधीतरी तो माझं कॉलेज सुरू झाल्यावर एकाच दिवसासाठी आला.

केदार आठ दिवसांनी दुकानात रोज यायला लागला. बाबा दुकानांत असला की तो समोर यायचादेखील नाही. घाबरत होता किंवा कदाचित स्वत:चीच लाजदेखील वाटत असेल. पण शेवटी चुकून किती चुकवणार. अखेर स्वत:च एकदा बाबासमोर आला आणि “चुकलं. माफ करा” वगैरे काहीतरी बोलून गेला. “पुन्हा चुकूनही स्वप्नीलचं नाव घेऊ नकोस” असा दम बाबानं भरला. मी आधीच विनंती केली होती म्हणून त्यानं केदारवर हात उचलला नाही इतकंच.

पण हीच विनंती मी आफताबला केली नव्हती. तो एकदा केदारच्या दुकानात गेला. आधी दोन शब्द हसून “कसा आहेस?” वगैरे काहीतरी बोलला आणि नंतर दुकानाबाहेर पडण्याआधी एकच खचकचून त्याच्या कानाखाली मारली.




Tuesday 5 July 2016

रहे ना रहे हम (भाग ११)

केदारने मला कितीही समजावलं तरी मनामध्ये भुंगा लागून राहिलाच. त्याच्या घरात तर रोज एक एपिसोड चालू होता. काकीने आजोबांना कुठूनही मिळवलेली माहिती सांगायला सुरूवात केली होती. त्यामध्ये माझे मित्र, माझं शिक्षण, माझे कपडे, माझं वाह्यात वागणं हे सर्व सामिल होतंच. शिवाय काकीला मिळालेला सर्वात मोठा जाळ म्हणजे माझ्या बाबाचं बाहेर असलेलं लफडं. माझ्या आईबाबाने कॉलेजात असताना पळून जाऊन लग्न केलं होतं. त्याही नंतर माझ्या जन्मानंतर बाबानं बाई ठेवली होती.
आता या गोष्टी काय केदारच्या घरात कुणाला माहित नव्हत्या अशातला भाग नव्हता. समोरसमोर तर गेली पंचवीस वर्षं त्यांची दुकानं होती. त्या बाईबद्दल केदारच्या वडलांना इत्यंभूत माहिती होती. पण काकीला हा विषय समजल्यापासून तिनं घरात तोच धोषा लावला होता. बाप असला तर  लेक तसलीच असा तिचा मुद्दा होता. हो नाही करत करत तिनं केदारच्या आजोबांना माझ्या विरूद्ध केलंच. केदार घरात नसला की या गप्पा व्हायच्या. तरी त्यानं कितीतरी वेळा घरात माझ्याबद्दल सांगितलं. त्यावर “तुला काय समजतंय? तुम्ही लफडी करा आम्ही निस्तरतो” असा आहेर मिळाला म्हणे. एकंदरीत काकीबाईंचा डाव क्लीअर होता. केदारचं भलं कशात आहे ते सांगत स्वत:च्या माहेराचं भलं करायचं. आता तुम्ही म्हणाल की हे केदारच्या घरामध्ये इतरांच्या लक्षात कसं आलं नाही. तर मग तुम्हाला किचन पॉलिटिक्स नावाच्या गोष्टीचा तुम्हाला काही अनुभव नाही. अगदी पोटतिडीकीने बोलत बोलत तिनं घरामध्ये सर्वांच्या घशाखाली स्वप्निल वाईट आहे हे उतरवलं. केदारची दोन नंबरची काकी देखील हळूहळू या विरोधाला सामिल झाली. तिचा युक्तीवाद बेफाम होता. उद्या मी सून म्हणून आले तर केदारच्या आईचं पारडं जड होणार. आफ्टर ऑल मी एकुलती एक होते आणि भल्यामोठ्या इस्टेटीची मालकिण होते. आज ना उद्या बाबाचं सर्व काही मलाच मिळणार होतं की.

यादरम्यान मी आणि केदार जवळजवळ रोज भेटत होतो. घरात काय घडतंय ते मला तपशीलवार सांगायचा, माझ्याइतकाच तोही भंजाळला होता.  इतका प्रखर विरोध होइल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. त्याच्या आईबाबांपेक्षा इतर चुलत्यांनीच अधिक विरोध चालू केला होता. केदार आणि मी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडलो तेव्हा चुकूनही हे इतकं विचित्र होइल असं आम्हा दोघांनाही वाटलं नव्हतं.
आमच्या घरात केवळ एकच मोठा प्रश्न होता. इतक्या लवकर लग्न करायचं का? आई तयार झाली, पण बाबा अजिबात तयार नव्हता.
“डिग्री झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही” हे त्याचं घोषवाक्य बनलं होतं.
“हे पंचवीस वर्षापूर्वी मला बोलायचं होतंस. तेव्हा बरा लग्नाला तयार झालास. आणि आता तुला हे नखरे सुचतायत. चांगलं स्थळ आहे. तिला मुलगा पसंद आहे. डिग्री लग्नानंतर करेल की”
“गौरी, मुलगा चांगला आहे म्हणून मी लगेच लग्न करून देऊ का? पसंद आहेत ना, मग थांबू देत की अजून एक वर्ष. परीक्षा होऊ देत, त्याच्या दुसर्‍या दिवशी लग्न लावून देतो.” हे आणि असेच संवाद अदलून बदलून आमच्या घरात ऐकू येत होते. एकदा तर बाबा आईला चिडून म्हणाला. “तिचं लग्न करून दिल्यावर आपण काय करायचं? एकच मुलगी आहे तिलापण इतक्या लवकर पाठवू का?”
अझरभाई मला एकदा म्हणाला. “सालं आमचं अरेंज मॅरेज असून दोन तासात सर्व फायनल झालं होतं. तुमचं लव्ह मॅरेज असून इतके घोळ चालू आहेत.” अर्थात त्या लग्नामध्ये अझरभाईला काही म्हणायचा हक्क नव्हताच. मला मात्र, बाबानं दोनतीनदा विचारलं. सध्या काहीच सुचत नव्हतं. एकीकडे शिक्षण फारसं महत्त्वाचं वाटत नव्हतं. तर दुसरीकडे इतक्या लवकर लग्न करायचंसुद्धा नव्हतं. मला केदारमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. लग्नाचाही प्रॉब्लेम नव्हता... पण एकंदरीत केदारच्या घरामधलं वातावरण फारसं आशादायक नव्हतं.
केदार आधीसारखा मला रोज रोज भेटत नव्हता. फोन केला तरी दुकानामधून किंवा बाहेरून कुठूनतरी. मलापण “अजिबात थोडे दिवस घरी फोन करू  नकोस” हे सांगितलं होतं. तो पण बिचारा अडकल्यासारखा झाला होता.
एके दिवशी संध्याकाळी गच्चीवर निवांत बसून होते. नुकताच सूर्य मावळला होता. हलका अंधार पसरला होता. आई कुणाच्यातरी लग्नाला गेली होती. बाबा घरातच होता. नेमके लाईट गेले होते. घरात मरणाचं उकडत होतं. गच्चीवर किमान वारा तरी मस्त येत होता. घरासमोरच्या बागेमध्ये बरीच मुलं खेळत होती. मी शाळेत असताना आमच्या कॉलनीमध्ये इतकी मुलं नव्हती पण आता पलिकडच्या रस्त्यावर दोन तीन अपार्टमेंट बांधल्या होत्या, तिथे बरीच कुटुंबं आली होती.
“निल्या, खाली येतोस का? चहा केलाय” त्यानं हाक मारली.
“थोड्यावेळानं येते” इतक्या गर्मीमधून चहा नकोच झाला होता खरंतर. बाबानं अजून दोनदा हाक मारली. तरी मी खाली येत नाही ते बघून तोच वर आला. “थंड चहा चांगला लागत नाही रे”
“गरम होतंय म्हणून इथं बसलेय. लाईट कधी येणारेत?”
“येतील तासाभरात. आपण ना इन्व्हर्टर बसवून घेऊ. हल्ली इकडे लोड शेडींगचं प्रमाण वाढलंय” बाबा माझ्याच बाजूला बसत म्हणाला. “आज कुठे बाहेर नाही का जायचं? जावईबापूंना भेटायला?”
“जावईबापू? सीरीयसली बाबा! किती घोळ चालू आहे ते दिसतायत ना!”
“घाबरू नकोस गं. पुढच्या वर्षी आपण लग्न लावू. मस्त एकदम. अख्खं गाव काय जिल्हा बघत राहील इतक्या थाटात लग्न करेन”
“पण डिग्री झाल्याखेरीज नाही. तुझा काय हट्ट आहे तेच मला कळत नाही”
“तुला काय कळायचं त्यात. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज मी लेकीचं लग्न लावणार नाही. तुला तुझ्या मर्जीनं लग्न करायचं स्वातंत्र्य आहेच.  फक्त त्यात मी नसेन. माझ्या लग्नांत तरी माझा सासरा कुठे होता. लग्नाच्या तिसर्‍या दिवशी त्याच्या घरी गेलो तर आम्हाला घराबाहेरच काढलं. झालं ते झालं. पण माझी मुलगी व्यवस्थित शिकलेली, आर्थिक आणि प्रत्येकच बाबतीमध्ये स्वावलंबी हवी. कुणावरही कशावरही ती अवलंबून नको” 

“अरे पण, केदार आहे. तू आहेस. आणि...”


“मी आणि गौरी काय आयुष्यभर पुरणार आहोत का? आज आहे तर उद्या नाही. आमच्या पश्चात तुला कोण बघणार आहे? काका आणि त्याची पोरं काय बघणार? एकटीच राहिलीस तर कशी राहशील? नवरा आयुष्यभर पुरतोच असं नाही. सासरचं कितीही इस्टेट असू दे, सुनेला त्यात काडीही मिळत नाही. त्यासाठी मला तुझं शिक्षण पूर्ण  हवंय. काही नाही तर किमान डिग्री तरी... तुझ्या आईनं आणि मी हाच गाढवपणा केलाय. माझं जाऊ देत, मी अभ्यासात कधीच हुशार नव्हतो. धंद्यात मात्र मी सगळी अक्कल वापरली. पण गौरीचं काय... दहावीला तुझ्यापेक्षा जास्त टक्के होते. काय फायदा झाला? प्रेमात पडली लग्न केलं आणि घरी बसली.”
“पण तिला प्रॉब्लेम काही झाला का? शिक्षण अजिबात नको..”
“काही प्रॉब्लेम झाला का? निल्या! आता सांगतोच. तुला आठवत नसेल पण तू दोन वर्षांची असताना माझं आणि गौरीचं भांडण झालं. खूप मोठं. मी बाहेर कुठंतरी लफडं केलं आणि ते तिला समजलं होतं. चिक्कार भांडली. रडली आणि म्हणाली घर सोडून जाते. नुसती धमकी दिली नाही तर गेलीसुद्धा. तुला घेऊन माहेरी गेली. मी पण तितकाच चिडलो होतो. जातेय तर जाऊदेत. नंतर चारपाच दिवसांनी जाऊन आणली असती. पण ती वेळ आली नाही. संध्याकाळी.. या अशाच तिन्हीसांजेच्यावेळी तुला घेऊन परत आली. दारात चपला काढल्या, तुला माझ्यासमोर ठेवलं आणि किचनमध्ये कामाला गेली. एकही शब्द न बोलता. त्याआधी मला गौरीवर कित्येकदा प्रेम आलं होतं, राग आला होता, पण त्यादिवशी पहिल्यांदा तिची दया आली. माहेरामध्ये तिला जागा नव्हती. कारण हे लग्न तिचा स्वत:चा निर्णय होता. माहेर सोडून दुसरीकडे कुठं रहायचं तर शक्य नव्हतं. दोन वर्षांची मुलगी, अर्धवट शिक्षण आणि एकटी बाई. मुकाट परत आली. ती जर परत आली नसती ना तर मला इतकं वाईट वाटलं नसतं जितकं तिच्या त्या निमूटपणामुळे वाटलं. त्यानंतर मी तिची माफी मागितली आणि आमचा संसार आधीसारखाच चालू झाला. पण मी तो दिवस आजही विसरलो नाहीये. हेच मला माझ्या मुलीबाबत घडायला नकोय. तिला स्वतंत्र जगता आलंच पाहिजे. वेळ आली तर ज्या चपला घालून ती बाहेर पडलीये त्याच दारात तिनं त्या चपला काढता कामा नये. असं काही तुझ्याबाबतीत होइल असं नाही पण माझं मन सर्व काही आलबेल होइल असंही मानत नाही. तुझी डिग्री म्हणजे केवळ डिग्री नाहीय. शिक्षण पूर्ण असणं म्हणजे एका अर्थानं स्वावलंबी असणं. गौरीच्या वेळी मी पण तितकाच मूर्ख होतो. मागेपुढे कसलाही विचार न करता प्रेमात पडलो म्हणून लग्न केलं. त्या मानाने तू आणि केदार समंजस आहात. केदार तर लाखपटीनं चांगला नवरा आहे. पण निल्या, माझी फक्त एकच इच्छा आहे रे. इतक्या लवकर मी तुला परक्याची करणार नाही”
“बाबा, तुला असं का वाटतं रे? मी फायनल इयर पूर्ण करणारच आहे.. तसंही केदारशी लग्न केलं तरी तुझी मुलगी म्हणून असेनच ना”
“होत नाही रे तसं निल्या. दुसर्‍यांकडे निघून गेलीस की आमची राहणार नाहीस. आणि खरं सांगू का? देवानं एकच तर मुलगी दिलीये. तिला हे असं अगदीच  वीसाव्या वर्षी दान दिलं तर...” बाबाला पुढे बोलताच आलं नाही इतका त्याचा गळा भरून आला होता. “लहान आहेस अजून.. अजून थोडे दिवस अशीच लहान रहा गं. इतक्यात नको जाऊस”
“बाबा, मी तुला आणि आईला सोडून कशी जाईन? पण माझं केदारवर प्रेम आहे. तो मला सुखात ठेवेल. मी जरी लग्न करून गेले तरी तुला रोज भेटेन. आईशिवाय रहाण्याची तर मीसुद्धा कल्पना करू शकणार नाही. तुला आणि आईला एकटं करून.... मी पण नाही राहणार. पण या सर्वांमध्ये केदारचे फार हाल होतायत. बेक्कार भरडला जातोय. त्याह्च्या घरामध्ये खूप विरोध होण्याआधी प्लीज लग्नाला हो म्हण. मी तुझ्या मनाविरूद्ध पळून वगैरे जाणार नाही. पण तुझ्या परवानगीची वाट बघत जर..”


“ठिक आहे. मी उद्य बोलेन त्यांच्याबरोबर. पण डिग्री मात्र पूर्ण करशील असं मला वचन दे....” तो बोलत असतानाच खाली हॉलमधला फोन वाजायला लागला. बाबा बोलायचा थांबला. माझे डोळे कधीचे वाह्त होते तेच मला माहित नव्हतं. डोळे पुसत खाली आले आणि फोन घेतला.
“काय करतेस?”
“केदार! आता पाच मिनिटांत तुलाच फोन करणार होते. ऐक ना”
“बोलू नकोस. अज्जिबात एक शब्द बोलू नकोस. मी तुझ्या घरी येतोय. गेटमध्ये तयार होऊन रहा. कुठ जातोय असं सुद्धा विचारू नकोस. माझ्याकडे एक गूड न्युज आहे. मी पाच मिनिटांत पोचतोय” इतकं बोलून त्यानं फोन ठेवला.
तो इतक्या भराभरा बोलला की मला काय सांगायचंय तेच राहिलं. बाबाला मी बाहेर जातेय रे इतकंच सांगितलं आणि ड्रेस बदलला. केदारने सांगिताल्यासारखं पाचव्या मिनीटाला तो माझ्या घरासमोर बाईक घेऊन उभा होता.
“चल”
“कुठे?”
“आपल्या घरी”