Thursday 21 August 2014

दरवाजा (भाग ३)

आई, मला बोलावलंय, तासाभरात जाऊन येतो. कुठे बाहेर पडू नकोस.” असिफने आरतीला आवाज दिला. आरती हातातली जुनी साडी केव्हाची फाडत बसली होती. जुनी म्हणजे अशीच कुणीतरी दिलेली साडी. देतानाच त्याला एवढी ठिगळं लावली होती की पोतेरं म्हणून देखील वापरता आली नसती. म्हणून असिफने तिला खेळायला दिली होती.
“मी येते” ती अचानक म्हणाली.
“नको. तुला परत काहीतरी म्हणतील. रात्रीचे आठ वाजलेत. भूक लागली तर जेवून घे.” तो शांतपणे म्हणाला आणि खोलीबाहेर पडला. तरी आरती त्याच्या मागोमाग आलीच. “नको म्हटलं ना..” तो ओरडला, तरी ती येत राहिली. शेवटी वैतागून तो मागे फिरला. तिच्या हातातली ती साडी काढून खोलीत ठेवली. तिचे विस्कटलेले केस सारखे केले. चेहर्‍यावर पावडर कुंकू लावलं. त्याच्या या लाडानं ती खुश झाली. “कशाला जातेस त्यांच्या घरी. तू आलेलं आवडत नाही. मला बोलावलंय म्हणजे काहीतरी काम असणार...” तो बडबडला. “फुकट तर बोलावणार नाहीत...”
“रेश्मा... रेश्मा” आरती तोंडात पुटपुटली.
असिफ हसला. “तिचा निरोप नाही आलाय, तिच्या बापाचा आलाय. मागच्या महिन्यांत रिक्षाची रोजंदारी वाढवून हवी होती त्याच्या बहिणीला. म्हणून बोलावलं अस्णार.”
रेश्माच्या घरी असिफ आणि आरती आले तेव्हा रेश्माच्या घरामध्ये स्मशानशांतता होती. एरवी ऐकू येणारा कसलाही गडबड गोंधळ दिसत नव्हता. पडवीमध्ये काम करणारे गडीमाणसं पण नव्हती. पडवीतून उभं राहून त्यानं आवाज दिला. रेश्माचा मोठा भाऊ बाहेर आला. त्याच्या चेहर्‍यावरचा संताप आणि तिरस्कार लपत नव्हता.
“काय रे ए? ज्यास्त माज आलाय?” तो वसकला. त्याच्यामागोमाग रेश्माचा बाप बाहेर आला. “रवी, तू बोलू नकोस. आत जा” त्यानं डबल गुर्मीत ऐकवलं.
“काय झालं?” असिफने विचारलं.
“भडव्या, मलाच विचारतोस काय झालं?” रेश्माचा बाप समोर आला आणि काडकन असिफच्या मुस्काटीत मारून ओरडला. “दोन वर्षं माझ्या पोरीला नासवत होतास.. आणि आता विचारतोस काय झालं?”
आरतीनं पुढे येऊन असिफला घट्ट धरलं. “मारू नकोस” ती कशीबशी म्हणाली.
“आई, तू घरी जा” असिफ हळू आवाजात म्हणाला.
“नको.. ते मारतात. खूप मारतात” भेदरल्या आवाजात आरती म्हणाली.
“काका, जे काय बोलासांगायचंय ते नंतर... आधी आईला घरी पोचवून येतो. तिच्यासमोर हे सगळं सहन होत नाही...तुम्हाला माहित आहे ना?”
“का सहन होत नाही? वेडीच तर आहे. अजून काय वेड लागायचं शिल्लक आहे. नंतर वगैरे काही नाही. आज आता इथं मी अख्खा चिरेन. माझी पोरगी म्हणजे काय रस्त्यावरचा माल वाटला? तुझी हिंमत तरी कशी झाली तिच्याकडे बघायची?” तो अजून जोरात खसकला. आरती अजूनच भेदरली. चढलेला आवाज ऐकून आतमधून रेश्माची आई बाहेर आली. “अहो, हळू बोला. शेजारीपाजारी कुणी ऐकलं तर चर्चा नको. घरात घेऊन काय ते बोला” नवर्‍याच्या जवळ जाऊन ती खुसफुसली.
काय चालू असावं याचा अंदाज असिफला थोडातरी आलाच होता. आजनाउद्या हा दिवस येईल याची भिती होतीच. घरात गेल्यावर नेहमीच्या सवयीनं आरती जमिनीवरच फतकल मारून बसली. असिफ तिच्या बाजूला उभा राहिला.
“काल मी माझ्या सोत्ताच्या डोळ्यांनी तुला बघितलंय.” रवी पुन्हा एकदा अंगावर धावून आला. “रेश्मासोबत तुझ्या खोलीमध्ये. खोटं बोलू नकोस. जीभ हास्टून देईन” असिफ काही बोलायच्या आधीच तो ओरडला. “काय केलंस तिच्यासोबत? लाज नाही वाटली? ज्या घरात भाकरी खातोस त्याच घराच्या इज्जतीवर हात मारतोस? भडव्या, तुझ्या बापाला जसा गाववाल्यांनी तुडवून मारला होता, त्याहून जास्त तुला तुडवून मारेन!”
“रवी, शांत हो.” पुन्हा एकदा रेश्माची आई आली. “असिफ, मी आजवर तुला कधीही नोकर मानलेलं नाही. घरच्या लेकासारखंच मानलंय. आरतीवहिनीच्या प्रत्येक दुखण्याखुपण्यामध्ये मदत केली आहे. तुला शिक्षणामध्ये कायम मदत केली आहे.” म्हणत त्यांनी अतापर्यंत केलेला प्रत्येक उप्कार घडाघडा बोलून दाखवला. असिफ शांतपणे हाताची घडी घालून ऐकत होता. आरती खाली बसून फरशी नखानं कुरतडत राहिली. रवी आणि रेश्माचा बाप धुमसत राहिले. “काल रवीने तुला रेश्मासोबत तुझ्या खोलीमध्ये एकत्र पाहिलं. कुठल्या अवस्थेमधे ते मी बोलायला हवं का?” एवढ्या वेळामध्ये तिचा आवाज अजिबात चढलेला नव्हता.
“झालं तुमचं बोलून? मी बोलू?” असिफ म्हणाला.
“बोलण्यासारखं काय आहे काय तुझ्याकडे भोसडीच्या?” रवी परत उसळला.
“शिव्या देऊ नकोस.” असिफ पहिल्यांदाच त्याच्याकडे बघत म्हणाला. “जे काही काल पाहिलंस त्याची बापाकडे येऊन चुगली करण्याआधी मला विचारायची हिंमत नव्हती? काल विचारलं असतं तर सांगितलं असतं...”
“काय सांगितलं असतं? माझ्या बहिणीवर जबरदस्ती करतोस... तिला नादाला लावतोस.” तो मध्येच ओरडला.
“अडीच वर्षापूर्वी लग्न केलंय. कसली जबरदस्ती केलेली नाही.. खोटं वाटत असेल तर बोलाव . लग्नाची कल्पनासुद्धा तिचीच होती. फक्त माझं शिक्षण पूर्ण होऊन कुणाला याबद्दल सांगणार नव्हतो”
“असिफ, बोलताना तोंडाला आवर घाल” पहिल्यांदा रेश्माच्या आईचा आवाज जरबेचा झाला होता. “तुझी औकात काय आहे ते बघ”
“औकात माहित आहे म्हणूनच इतके दिवस लपवून ठेवलं होतं ना? कुणालाही फसवायचा किंवा नासवायचा इरादा नव्हता. जोपर्यंत मी माझ्या स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभं राहत नाही, तोपर्यंत याबद्दल सांगणार नव्हतो. नोकरी मिळाल्यावर सर्वांना खरं काय ते सांगणार होतोच,”
“तू तोंड वर करून बोलू नकोस.” रवी परत एकदा किंचाळला... “भोळ्या पोरीला फसवतोस. नादाला लावतोस. आणि वर खोटं बोलतोस...”
“काय खोटं बोललोय? रेश्माला बोलवा इथे. तिलाच विचारा ना.”
“असिफ, मी स्वत: तिला विचारलंय. तिच्या वडलांनी काल किती मारलंय ते बघ. पोर एवढी भेदरली होती की कालपासून तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. आता संध्याकाळी देवाच्या मूर्तीवर हात ठेवून तिनं खरं काय ते सांगितलं. तू तिला भुलवलंस... नादाला लावलंस आणी तिच्यावर जबरदस्ती करून गेली दोन वर्षं तिला भोगत राहिलास. याबद्दल कुणासमोर काही बोलशील तर तिचे कॅमेयामध्ये नागडे फोटॊ सर्वांसमोर दाखवशील अशी धमकी दिली होतीस ना... अरे, लेकासारखा पोसला तुला आणी तू हे पांग फेडलेस. बिनाबापाचा आणि वेड्या आईचा म्हणून सगळे नखरे केले. हे दिवस दाखवलेस?”
“हे बघा, तुम्ही तिला बोलवा. माझ्यासमोर समक्ष काय ते सांगू देत. माझ्याकडे दोन वेळेला जेवायला पैसे नाहीत. कॅमेरा कुठून असेल आणि तिनंच मला प्रेम असल्याची कबूली दिली होती. बोलवा तिला. काय खरं आणि काय खोटं ते होऊन जाऊ देत.”
“काही गरज नाही” एवढा वेळ शांत बसलेला रेश्माचा बाप कडाडला “यापुढे तुला रेश्माच काय तिचं नखसुद्धा दिसणार नाही. खूप झाली बोलाबाली. आपले हात एवढे वरपर्यंत पोचलेत की तुला आणि तुझ्या आईला एका दिवसांत गायब करेन. गावातून हाकलून देईन. एक तर तुम्ही खालच्या जातीतले असूनसुद्धा आम्ही घरात घेत होतो. तेच चुकलं. फार मोठ्या समाजसुधारकाचा पोरगा आहेस ना? आता कळली तुमची लायकी...”
“नाही... ओरडू नकोस.” आरती मध्येच म्हणाली. “लग्न झालं. मी पाहिलं. मला रेश्मानं सांगितलं. मला लाडूपण दिला.. हो ना शेखर.. बोल. सांग”
आरतीच्या या बोलण्यावर पहिल्यांदाच रेश्माची आई गप्प बसली. रेश्माचा बाप काही न सुचून बायकोकडे बघायला लागला. “मी खोटं बोलत असेल. पण माझी आई... वेडी आहे.. ती का खोटं बोलेल? रेश्माला इथं बोलवा. तिनं आणि मी दोन वर्षापूर्वी गावाबाहेर जाऊन देवळांत लग्न केलंय. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मला अजून एक वर्ष द्या. चांगली नोकरी मिळाली की मी रीतसर लग्न करेन. तुमच्या मुलीला खूप सुखात ठेवेन. विश्वास ठेवा” असिफ हात जोडून म्हणाला.
पण त्याच्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. त्या रात्रीपासून रेश्मा त्याला कधीच दिसली नाही. रेश्माच्या बापानं त्याच्यासमोर गाव सोडून जायचं हीच एक अट ठेवली होती. रवीने आरतीचा हात धरला आणि तिला ओढत नेऊन गेस्ट हाऊसमध्ये बंद केलं. “रेश्माचं लग्न होइपर्यंत ती इथेच राहील. व्यवस्थित खायलाप्यायला देऊ. पण जर तू तुझं तोंड कुठं उचकटलंस तर तिचा मुडदाच हातात देईन. रवीला खोलीवर घेऊन जा, ते फोटो काय आहेत ते त्याचा ताब्यात दे”
“फोटो नाहीत. लग्नासाठी घेतलेली एक दोनशेदहा रूपयाची साडी आणि एक ग्राम सोन्याचं मंगळसूत्र आहे, ते धाडून देतो.” असिफ शांतपणे म्हणाला आणि परत खोलीवर आला. कोपर्‍यातली पहार उचलली आणि त्याच्या आईवडलांनी बांधलेली ती खोली रात्रभर पाडत राहिला. गावातल्या प्रत्येकानं “आसं का करतोस?” हे विचारलं. त्याच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. रेश्मा खोटं बोलली होती. तिच्या घरी कधीही समजलं असतं तरी त्यानं समजावलं अस्तं. तिला सुखात ठेवलं असतं, पण ती खॊटं बोलली होती. “आपण लग्न करू या?” हे तिनंच उच्च्चारलेलं वाक्य आणि त्यानं वेड्यासारखं ते कबूल केलं होतं. आणि आज त्याच रेश्मानं त्याला बलात्कारी ठरवलं होतं.
चुलीतल्या निखार्‍यासारखा दोन दिवस धुमसत राहिला. एसटीस्टॅण्डजवळच्या बारमध्ये जाऊन चिक्कार प्यायला. गावभर विनाकारण फिरत राहिला. पण डोक्यातला अंगार थंड होइना. प्रचंड संताप आला होता. आरतीची काहीही खबरबात नव्हती. एक दोनदा रवीला भेटून त्यानं आरतीबद्दल विचारलं तेव्हा त्यानं झुरळासारखं झटकून टाकलं होतं.
अखेर त्यानं स्वत:लाच समजावलं. खूप झालं असिफ एका मुलीसाठी स्वत:ची कीव करणं. तिच्यामुळं तुझं आयुष्य का बरबाद करतोस.... तुला यातून बाहेर पडायलाच हवं. आपण इतके मूर्ख कसे काय ठरलो. रेश्माला लग्न करायचंच नव्हतं, त्यानं वारंवार नकार दिल्यावर त्याला अंथरूणात ओढण्यासाठी तिनं हे लग्नाचं टुमणं काढलं होतं. आपण ज्याला प्रेम समजत होतो ते दोघांसाठी पण केवळ वासनेचंच रूप होतं. त्याला “लग्न” असं गोंडस नाव देऊन रेश्मानं तिला जे हवं ते मिळवलं होतं आणी त्याला जे हवं होतं ते दिलं होतं. पण आता ते नातं संपलं होतं. ती गरज संपली होती. रेश्माच्या दृष्टीनं हे लग्न संपलेलं होतं. असिफच्या दृष्टीनं रेश्माच संपली होती.
शेवटी तो रेश्माच्या बापाकडे गेला. “मुंबईतला पोरगा बघितलाय ना? मला त्याचा फोननंबर मिळालाय. फोन करून तुमच्या लेकीची खरी हकीकत सांगू?” अत्यंत थंड आवाजात तो म्हणाला.
“हे बघ, आरती माझ्या ताब्यात आहे..”
“मारून टाका. मला फरक पडत नाही. नाहीतरी वेडी आई माझ्या पायातली बेडी झाली आहे. ती गेली तर मी गावाबाहेर तर जाऊ शकेन... होणार्‍या जावयाला तुमच्या मुलीचे सगळे किस्से रंगवून रंगवून सांगेन. तुझ्या पोरीच्या अंगावरच्या प्रत्येक तीळाचा हिशोब सांगेन. मी म्हणतो आम्ही लग्न केलं होतं, म्हणून त्या हक्कानं मी तिच्याबरोबर झोपत होतो. ती म्हणते मी जबरदस्ती केली, बलात्कार केला. कुठलंही व्हर्जन तुमच्या जावयाला सांगितलं तरी परिणाम काय होइल ते चांगलंच माहित आहे. गावामध्ये ही खबर उडवायला मला पाच मिनीटं लागणार नाहीत.... बोला काय करायचं?”
रेश्माचा बाप गडबडला. साध्याभोळ्या असिफकडून ही अपेक्षा त्यानं चुकूनही केली नव्हती. “पाच लाख रूपये. कॅशमध्ये” असिफ पुढे म्हणाला. “दोन दिवसांमध्ये आणून द्या. मी आणि माझी आई तुम्हाला या गावात परत दिसणार नाही. परत तोंडातून रेश्माचं नाव काढणार नाही...”
“आणि पैसे घेऊन शब्दाला फिरलास तर...”
“मी शेखरचा मुलगा आहे. बाकी, माझाबाप कसाही असला तरी शब्दाला मागे फिरणारा नव्हता हे तुम्हीच सांगितलं होतं ना? तुमच्या मुलीच्या सुखाआड मी येणार नाही पण मला पैसे द्या!” म्हणून तो मागे वळला.
दोन पावलं गेलेला पाठी आला आणि म्हणाला, “रेश्मासाठी एक निरोप आहे. तिला माझ्यातर्फे धन्यवाद द्या. आयुष्यामध्ये कुठलीही व्यक्ती स्वत:पेक्षा महत्त्वाची नसते हा धडा तिच्यामुळे मिळाला. शंभर बूकं वाचली असती तरी हे ज्ञान इतक्या सहज मिळालं नसतं”
दोन दिवसांनी असिफ आणि आरतीनं गाव सोडलं. पैसे घेऊनच. इतर कुणालाच हे माहित नव्हतं. रेश्मा तेव्हा स्वत:च्याच लग्नाच्या तयारीमध्ये अडकली होती. आता तिच्या स्वप्नांचा राजकुमार मोहित झाला होता.
_++++++
“आता अजून एकच जिना राहिला” स्वत:लाच म्हणत रेश्मा धापा टाकत उभी राहिली. कशीबशी एक एक पायरी चढत ती दरवाज्याजवळ आली. कुलूप उघडणार इतक्यात समोरच्या फ़्लॅटचा दरवाजा उघडला. रेश्माला वाटलं, माही आली. पण असिफला समोर आलेला पाहताच ती गडबडली. त्याचं लक्ष नव्हतं, तो मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत होता. तिनं कुलूप उघडल्याचा आवाज आल्यावर त्यानं मान वर करून पाहिलं. एका निमिषांत त्यानं मान परत मोबाईलमध्ये घातली.
ती जागच्या जागी थिजली होती. शेवटी हिंमत करून हाक मारली. “असिफ..” तो लिफ्टची वाट बघत उभा होता. “कसा आहेस?”
तिच्या अचानक आलेल्या प्रश्नावर तो गालातच हसला. किती वर्षांनी तिनं असिफला असं हसताना पाहिलं होतं.
“कसा दिसतोय?”
“माही दिसली नाही, दोन तीन दिवसांत” ती म्हणाली. बोलताना घश्याला कोरड पडत असलेली तिला जाणवत होती. असिफ तिच्यापासून अवघ्या दहा फुटांवर उभा होता. तिची नजर त्याच्या चेहर्‍यावरच थबकून राहिली होती. कितीप्रयत्न केला तरी नजर हटेचना.
“गावाला गेलीये. तिच्या आईची तब्बेत बरी नाही. आठ दिवसांनी येईल” असिफ अजूनही तिच्याकडे बघत नव्हता, नजर मोबाईलमध्येच होती.
“आरती काकी...”
"दहा वर्षापूर्वी गेली.” तो तितक्याच शांत आवाजात म्हणाला. लिफ्ट येऊन गेली, तरी त्याचं लक्ष नव्ह्तं.
“ऐकून वाईट वाटलं.... त्यांची मध्येच कधीतरी खूप आठवण येते.”
असिफने पहिल्यांदाच वर मान करून तिच्याकडे सरळ रोखून पाहिलं. इतका वेळ अनोळखी असणारी त्याची नजर अचानक संतापी बनली. “नावसुद्धा घेऊ नकोस.” तो पुटपुटला.
“आय ऍम सॉरी!” ती हळूच म्हणाली. “त्यावेळेला खरं सांगते, तुला संपर्क करायचा खूप प्रयत्न केला. पण…..”
असिफने काही न बोलता पुन्हा एकदा लिफ्टचं बटण चारपाचवेळा दाबलं. लिफ्ट ग्राऊंड फ़्लोअरलाच थांबली होती. “असिफ, प्लीज मला माफ कर…मी तेव्हा चुकले. पण प्लीज हात जोडते. यासंदर्भात यांना काही बोलू नकोस.” रेश्मा अचानक म्हणाली.
“कशाबद्दल?” असिफनं परत शांतपणे विचारलं. रेश्माच्या घश्यामध्ये हुंदका दाटून आला. डोळ्यांतून पाणी आलं. ते पाहताच असिफ तिच्या एकदम जवळ आला. दोन्ही हातांनी तिचे दंड घट्ट धरले. तिच्यात आणि त्याच्यात केवळ काही श्वासांचं अंतर उरलं होतं. “फक्त तुझा स्वत:चा विचार कर. अजून कुणाचा करू नकोस” तो कुजबुजला. “मी वाटलो काय तुला? आं? हे असं करायचंच असतं ना तर फार आधी केलं अस्तं. तुझा जीवसुद्धा घेतला असता.. पण मला गरज वाटली नाही. कारण, माझ्यासाठी तू तितकी महत्त्वाची नाहीस” त्यानं धरलेला दंड सोडला. त्याच्या नजरेमधल्या रागाचा तिरस्काराचा चटका तिला जाणवला.
असिफ धाढधाड जिना उतरून खाली निघून गेला. रेश्मा तिथंच दरवाज्यात खाली मटकन बसली. असिफने जिथं तिचा दंड धरला होता, तिथं त्याची बोटं उमटली होती. लालगुलाबीसर रंगाच्या असिफच्या खुणा. कितीतरी वेळ ती तो स्पर्श परत परत अनुभवत राहिली. कितीतरी वेळ ती असिफच्या अंगाचा वास श्वासांत भिनवत राहिली. कितीतरी वेळ ती त्याच्या शब्दांच्या प्रत्येक नादाला गुणगुणत राहिली.
पुन्हा एकदा शरीराच्या नसेनसेतून “असिफ हवाय” याचा गजर झाला. असिफ हवाच होता. कसंही करून!!



दरवाजा (भाग 4)

No comments:

Post a Comment